इराण–इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मध्य-पूर्व व आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा विचार करून परदेशात वास्तव्यास असलेल्या तसेच अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने अत्यावश्यक सूचना जारी केल्या आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसेच संबंधित देशांतील भारतीय दूतावासांनी २४×७ आपत्कालीन हेल्पलाईन सुरू केल्या असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा व स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
परदेशात अडकलेल्या नागरिकांबाबत माहिती देण्यासाठी अथवा आपत्कालीन मदतीसाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्र (SEOC) २४×७ कार्यरत राहणार आहे. नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १०७७, मोबाईल +९१-९३२१५८७१४३, दूरध्वनी ०२२-२२०२७९९० किंवा controlroom@gov.in व कुवैत फोन : +९६५-६५५०१९४६ (२४×७ आपत्कालीन), ई-मेल : community.kuwait@mea.gov.in या ई-मेलवर संपर्क साधावा.
देशनिहाय आपत्कालीन संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत. कतार (दोहा), संयुक्त अरब अमिरात (अबूधाबी/दुबई) आणि सौदी अरेबिया (रियाध/जेद्दाह) येथील भारतीय दूतावासांचे हेल्पलाईन क्रमांक व ई-मेल आयडी नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.
राज्य शासनाने सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे, स्थानिक घडामोडींवर लक्ष ठेवण्याचे व अधिकृत सूचनांची प्रतीक्षा करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्यात येईल, असेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने स्पष्ट केले आहे.