- मुंबई उपनर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांची माहिती
मुंबई : एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन मुंबईच्या ट्राफिक मॅनेजमेंटचा प्लॅन तयार करण्यात येत आहे. तसेच याबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा मुंबई उपनर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांनी विधानसभेत दिली.
विधानसभेत आज (२८ फेब्रुवारी) आमदार मुरजी पटेल यांनी अंधेरी येथे होणाऱ्या वाहतुक कोंडीकडे सरकारचे लक्ष वेधले. तर दुसरीकडे आमदार अस्लम शेख यांनी मुंबईतील अनेक रस्त्यांवर प्रवेश नसलेल्या मार्गावर उलट दिशेने गाड्या चालवल्या जात असल्यामुळे होणारे अपघात आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी याबद्दल तक्रार केली. तसेच आमदार वरुण सरदेसाई यांनी वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्रातील बिकेसी, कला नगर, कुर्ला ते सांताक्रुझ जोड मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्ग या परिसरात होत असलेल्या वाहतुक कोंडीकडे सभागृहाचे लक्ष वेधले तर आमदार दिलीप लांडे यांनी चांदिवली परिसरातील वाहतुक कोंडीचा मुद्दा मांडला.
यावर उत्तर देताना मुंबई उपनर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांनी सांगीतले की, याबाबत नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली असून, वाहतूक विभागाचे सहपोलिस आयुक्तांना याबाबत निर्देश दिले आहेत. तसेच एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन मुंबईचा वाहतूक नियोजन आराखडा मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार तयार करण्यात येत असल्याचे सांगितले.
तसेच मुंबईतील रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आलेल्या भंगार गाडयांचा प्रश्नही लवकरच मार्गी लागणार असून मुंबई महापालिका याबाबत कार्यवाही करीत आहे, तसेच मुंबईतील आमदारांनी ज्या सूचना केल्या आहेत त्याचा विचार करुन याबबात लवकरच बैठकही घेण्यात येईल, असे मंत्री ॲड आशिष शेलार यांनी सांगितले.