मुंबई: भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात प्रेरणादायी आणि शक्तीशाली नारा ठरलेल्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताबाबत केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्वांच्या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेच्या सर्व अधिकृत कार्यक्रमांमध्ये आता ‘वंदे मातरम्’चे संपूर्ण सहा कडव्यांसह गायन केले जाणार आहे. हे राष्ट्रीय गीत बंधनकारक करण्यासंदर्भात महापालिका सभागृहात ठराव करून त्याला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे येत्या काही दिवसात याची अंमलबजावणी होताना दिसणार आहे. महापालिका सभागृहनेते गणेश खणकर यांनी ठरावाच्या सूचनद्वारे ही मागणी केली होती आणि त्याला महापौर रितू तावडे यांनी मंजुरी दिली आहे.
महापालिका सभागृहनेते गणेश खणकर यांनी महापालिका सभागृहात ठरावाच्या सुचनेद्वारे ही मागणी करताना, ‘वंदे मातरम्’ हे गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ७ नोव्हेंबर १८७५ रोजी रचले होते. या गीताला ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने केंद्र शासनाने त्याच्या गायन आणि वादनाबाबत नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानुसार सर्व सरकारी कार्यक्रम, अधिकृत समारंभ, राष्ट्रपती व राज्यपाल यांच्या कार्यक्रमांमध्ये तसेच शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’चे तीन मिनिटे दहा सेकंदांचे संपूर्ण सहा कडव्यांसह गायन करणे बंधनकारक करण्यात आले असून, त्या वेळी सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहणे आवश्यक आहे.
याच धर्तीवर, महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रम, महापालिकेच्या शाळांमधील समारंभ तसेच इतर अधिकृत कार्यक्रमांमध्येही ‘वंदे मातरम्’चे संपूर्ण सहा कडव्यांसह वादन व गायन अनिवार्य करण्यात यावे, असे मत व्यक्त केले आले आहे. विशेषतः महापौर, आयुक्त किंवा अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांपूर्वी ‘वंदे मातरम्’ वाजविण्याची सक्ती असावी, अशीही सूचना खणकर यांनी केली होती.
या संदर्भात संबंधित प्रशासनाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करून अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती, यांना महापौर रितू तावडे यांनी मंजुरी देत याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात त्वरीत अहवाल देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे आगामी काळात सर्व अधिकृत कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’चा निनाद घुमलेला पाहायला मिळेल.