मुंबई: आज 'मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट लिहित मराठीजनांना, मराठी भाषा प्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत. एरवी मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आक्रमक होणाऱ्या राज ठाकरेंनी आज 'कृत्रिम बुद्धिमत्ता' (AI) आणि 'डेटा' या आधुनिक शस्त्रांच्या जोरावर मराठी भाषेचे वर्चस्व जगभरात निर्माण करण्याबद्दल सांगितले आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत मार्मिक निरीक्षण नोंदवले आहे. ते म्हणतात, "दहा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागला तेव्हा जमीन महत्त्वाची होती, औद्योगिक क्रांतीत मशिन्स आले, आणि आता 'एआय'च्या युगात डेटा (विदा) हीच सर्वात मोठी शक्ती आहे. ज्या भाषेतून सर्वात जास्त डेटा तयार होईल, ती भाषा जगात शक्तिशाली ठरेल, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
एआयमुळे नोकऱ्या जातील अशी भीती व्यक्त केली जात असताना राज ठाकरेंनी सकारात्मक बाजू मांडली. "मराठी माणसाने हे तंत्रज्ञान आत्मसात केले, तर तो स्वतःचे मोठे साम्राज्य उभे करू शकतो. जगातील बलाढ्य कंपन्या गेल्या २०-३० वर्षांतच उभ्या राहिल्या आहेत, ते मराठी तरुणांनाही शक्य आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काय म्हणाले राज ठाकरे?
आज मराठी भाषा गौरव दिवस. सर्वप्रथम सर्व मराठी भाषिकांना आणि जे मराठी भाषिक नाहीत पण जे मराठी भाषेचा इथे राहून आदर करतात आणि बोलतात किंवा बोलायचा प्रयत्न करतात त्यांना देखील मनःपूर्वक शुभेच्छा. आजच्या दिवसाची ही पोस्ट लिहिताना गेले काही दिवस सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता याबद्दल जी चर्चा सुरु आहे, त्याचे संदर्भ आहेत. त्यात दिल्लीत एआय परिषद झाली त्या सगळ्याचे संदर्भ पण डोक्यात घोळत होते. त्यातच अँथ्रोपिकच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीने जगभरात जी घुसळण सुरु केली आहे. त्या अँथ्रोपिकचा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्री. राहुल पाटील ही मराठी व्यक्ती आहे ही पण बाब महत्वाची होतीच .या निमित्ताने कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातील लोकांशी चर्चा केली, त्यांचं म्हणणं समजवून घेतलं आणि त्यातून जे जाणवलं ते आज मराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्ताने मांडत आहे.
आज फक्त मराठीच नाही तर जगातील सगळ्याच स्थानिक भाषा ज्यांना स्वतःची लिपी आहे अशा सगळ्यांसाठी एक खूप मोठी संधी आहे. मध्यंतरी मला काही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रणाली दाखवल्या. त्या बघितल्यावर एक लक्षात आलं ते म्हणजे आता ज्ञान मिळवायला किंवा व्यक्त व्हायला किंवा अर्थार्जन करायला या प्रणालींचा हवा तसा वापर करणं शक्य आहे. आणि त्यासाठी तुम्हाला तुमची मातृभाषा उत्तम येत असेल तरी तुम्ही मागे पडू शकत नाही.
दहा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागला आणि त्यानंतर जमीन ही मोठी शक्ती ठरली. औद्योगिक क्रांतीनंतर मशिन्स ही मोठी शक्ती वाटायला लागली. जसं डिजिटल युग सुरु झालं तसा डेटा शक्तिवान ठरला आणि आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात हा डेटा ज्या भाषांमधून तयार होईल त्या भाषा शक्तिशाली ठरतील. आणि म्हणूनच माझे महाराष्ट्र सैनिक असोत की इतर मराठी जनांनी, मराठी भाषेतून अतिप्रचंड पण उत्तम दर्जाचा डेटा तयार होईल हे बघितलं पाहिजे, अशा आशयाची पोस्ट राज यांनी केली आहे.