- २६ फेब्रुवारीला सुनेत्रा पवार स्वीकारणार राष्ट्रीय अध्यक्ष पदाची सूत्रे
मुंबई : महाराष्ट्रातून निवृत्त होणाऱ्या राज्यसभेच्या ७ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कोट्यातून पार्थ अजित पवार यांना संधी दिली जाणार आहे. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी रात्री उशीरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक देवगिरी निवासस्थानी पार पडली. या बैठकीत पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पद रिक्त झाले आहे. या जागी अन्य कोणत्याही नेत्याऐवजी अजित पवार यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड करावी, अशी बहुतांश आमदारांची आणि पदाधिकाऱ्यांची भावना आहे. ही भावना लक्षात घेऊन येत्या २६ फेब्रुवारी रोजी त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड केली जाणार आहे.
२६ फेब्रुवारीला कोअर कमिटीची बैठक :
येत्या २६ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. वरळी येथील एनएससीआय डोम सभागृहात ही बैठक होईल. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड केली जाणार आहे.
राज्यसभेचे गणित असे...
- राज्यसभेच्या सात जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांचे गणित पाहता महाविकास आघाडीची मोठी अडचण होणार आहे. विधानसभेत सध्या भाजपाकडे १३१, शिवसेनेकडे ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार) ४० असे महायुतीचे भक्कम बलाबल आहे. याउलट, उबाठा गटाकडे २०, काँग्रेसकडे १६ आणि शरद पवार गटाकडे केवळ १० आमदार उरले आहेत.
- या आकडेवारीनुसार, महायुती सातपैकी किमान सहा जागा सहज जिंकू शकते. उरलेल्या एका जागेसाठी महाविकास आघाडीला आपल्या तिन्ही घटक पक्षांच्या मतांची एकजूट करावी लागेल. काँग्रेस, उबाठा आणि शरद पवार गट एकत्र आले तरच एका उमेदवाराचा विजय निश्चित होऊ शकतो.
- येत्या २ एप्रिल रोजी निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये शरद पवारांसह त्यांच्या पक्षाच्या फौजिया खान, रजनी पाटील (काँग्रेस) आणि प्रियांका चतुर्वेदी (उबाठा), धैर्यशील पाटील (भाजप), डॉ. भागवत कराड (भाजप) आणि रामदास आठवले यांचा समावेश आहे.
पार्थ पवारांना हवी सहा वर्षांची टर्म :
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे राज्यसभेची आणखी एक जागा रिक्त होणार आहे. सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेतील कार्यकाळ जुलै २०२८ पर्यंत होता. त्यामुळे उर्वरित कालावधीसाठी पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठवायचे की सहा वर्षांच्या पूर्ण मुदतीच्या जागेवर त्यांची निवड करायची, यावर पक्षात खल सुरू होता. मात्र, पार्थ पवार हे पूर्ण सहा वर्षांच्या खासदारकीसाठी आग्रही असल्याने त्यांना विद्यमान निवडणुकीतून राज्यसभेवर पाठवले जाणार आहे.