नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक वारसा स्थळ लाल किल्ला पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या रडारवर आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी मिळवलेल्या ठोस सूचनांनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आणि संभाव्य हल्ल्याचा कट उधळण्यात यश आले. या प्रकरणात ISI संबंधित बांगलादेशी कनेक्शन असल्याचे तपासात उघड झाले आहे.
काय होता संशयित कट?
गेल्या काही दिवसांत ‘लष्कर-ए-तोयबा’कडून दिल्लीतील काही भागांवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली होती. विशेषतः लाल किल्ला आणि चांदणी चौक परिसरातील धार्मिक स्थळांवर स्फोटकांचा कट रचत असल्याचा संशय यंत्रणांना आला होता. काही ठिकाणी हाय अलर्ट देऊन बॉम्बशोधक पथके तैनात करण्यात आली होती.
इस्लामाबादमधील अलीकडील घटनेचा बदला घेण्याच्या उद्देशाने हा डाव आखण्यात आल्याची शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत.
देशभरातून संशयितांना ताब्यात
दिल्ली पोलीस यांनी केलेल्या कारवाईत तामिळनाडू येथून सहा जणांना अटक करण्यात आली, तर पश्चिम बंगालमधून आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आले. मिजानूर रहमान, मोहम्मद शबत, उमर, मोहम्मद लितान, मोहम्मद शाहिद आणि मोहम्मद उज्जल अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तपासादरम्यान ८ मोबाईल हँडसेट आणि १६ सिमकार्ड जप्त करण्यात आली आहेत.
'Free Kashmir' पोस्टर प्रकरणाचीही चौकशी
८ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील काही प्रमुख भागांमध्ये आणि मेट्रो स्थानकांवर ‘Free Kashmir’ अशी पोस्टर्स लावल्याची बाबही तपासात समोर आली आहे. एका आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेदरम्यान हे पोस्टर्स चिकटवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी सोशल मीडियावरून परस्पर संपर्कात राहून पाकिस्थानातील संघटनांच्या समर्थनार्थ पोस्ट देखील करत होते.
सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा भर
घटनेनंतर दिल्लीसह इतर संवेदनशील भागांत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. केंद्रीय यंत्रणा आणि स्थानिक पोलीस मिळून या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. संभाव्य धोका टळल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी राजधानीतील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.