Aditi Tatkare : दादा एकटे गेले नाहीत, आमचा रुबाब आणि माजही सोबत घेऊन गेले!" मंत्री आदिती तटकरेंचा विधीमंडळात अश्रूंचा बांध फुटला

मुंबई : अजितदादांच्या निधनाला महिना उलटला असला तरी, त्यांच्या आठवणींनी आजही त्यांचे सहकारी भावूक होत आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सभागृहात आपली भावना व्यक्त करताना सांगितले की, "दादा आजही आपल्यातच आहेत असा एक भास मनात होता, मात्र आज सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर तो भ्रम अखेर तुटला." नेहमी ज्या खुर्चीवर बसून अजितदादांनी सभागृहावर आपला दरारा निर्माण केला होता, ती जागा आज रिकामी पाहून आदिती तटकरे यांना अश्रू अनावर झाले. "ज्या सभागृहावर दादांचे अफाट प्रेम होते, त्याच ठिकाणी आज त्यांना न पाहणे अत्यंत वेदनादायी आहे. या मोठ्या नेत्याशिवाय आता आपल्याला पुढचा प्रवास करावा लागणार आहे, हे कटू सत्य आज नाईलाजाने स्वीकारावे लागत आहे," अशा शब्दांत त्यांनी आपला शोक व्यक्त केला.



माझ्या मुलांचं बोलणं अजून बाकी आहे..."


अनेक ज्येष्ठ नेत्यांनी दादांसोबत ३५-४० वर्षे काम केले असले, तरी आदिती तटकरे यांचा दादांशी असलेला ऋणानुबंध वयाच्या १२ व्या वर्षापासूनचा आहे. २०१२ मध्ये जेव्हा 'राष्ट्रवादी युवती काँग्रेस'ची स्थापना झाली, तेव्हा सुप्रिया सुळे आणि अजितदादांच्या उपस्थितीत सकाळी ७:१० वाजता त्यांनी आपले नियुक्तीपत्र स्वीकारले होते. दादांच्या कामाची शिस्त किती कडक होती, याचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, दादांचा 'जनता दरबार' पहाटे पावणे सात वाजताच सुरू व्हायचा. २०१९ मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर, सभागृहाचे कामकाज कसे चालते, याचे बारकावे आदिती तटकरे यांनी थेट अजितदादांकडून शिकले. अर्थसंकल्पावरील चर्चा असो किंवा पुरवणी मागण्या, नेमका 'बाब क्रमांक' आणि 'पान क्रमांक' वाचून मुद्देसूद कसे बोलावे, याचे प्रशिक्षण दादांनीच त्यांना दिले. नागपूर अधिवेशनातील एक आठवण सांगताना त्या म्हणाल्या की, दादा आम्हाला लॉबीमध्ये बसवून मार्गदर्शन करायचे. जोपर्यंत आमच्यासारख्या नवीन आमदारांचे भाषण पूर्ण होत नसे, तोपर्यंत दादा सभागृहात थांबून राहायचे. "माझ्या मुलांचे बोलणे अजून बाकी आहे," असे हक्काने सांगणारे दादा आज आपल्यात नाहीत, हे सांगताना आदिती तटकरे यांचे डोळे पाणावले. अजितदादा दर मंगळवारी आम्हाला भेटायचे, इतका दांडगा संपर्क, इतकं मार्गदर्शन, बारीक सारीक गोष्टींवर त्यांचं लक्ष असायचं. व्यक्ती गमावण्याचं दु:ख मोठं असतं. त्याच्या पेक्षा अधिक दु:ख मोठं असते ती व्यक्ती पाहायला मिळणार नाही, त्यांचा आवाज कधी ऐकायला येणार नाही, ही भावना मनाला दु:ख आणि वेदना देणारी असते, असं आदिती तटकरे म्हणाल्या.



"आमचा स्वाभिमान आणि रुबाबही दादांसोबतच गेला..."


आज दादांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या कामाचे कौतुक करत आहे, त्यांच्या कर्तृत्वाची गाथा गायली जात आहे; मात्र हीच प्रशंसा जर त्यांच्या हयातीत 'कणभर' जरी झाली असती, तर त्यांना अधिक जोमाने काम करण्याचे प्रोत्साहन मिळाले असते. एक कार्यकर्ता म्हणून ही उणीव कायम मनाला बोचत राहील, अशा शब्दांत त्यांनी आपली खंत व्यक्त केली. अजितदादांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडताना आदिती तटकरे म्हणल्या की, "प्रत्येकाचा एक नेता असतो आणि त्या नेत्याच्या कर्तृत्वावर कार्यकर्त्यांचा अभिमान अवलंबून असतो. दादा जेव्हा सभागृहात किंवा मंत्रालयात चालत यायचे, तेव्हा त्यांचा तो विशिष्ट रुबाब पाहून आम्हाला आमचा नेता असल्याचा 'माज' वाटायचा. पण आज दुर्दैवाने तो रुबाबदार नेता आपल्याला सोडून गेला आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एक व्यक्ती गेली नाही, तर आम्हा कार्यकर्त्यांचा तो स्वाभिमान, तो रुबाब आणि तो अधिकारही त्यांच्यासोबत निघून गेला आहे." अजितदादांनी घेतलेल्या क्रांतिकारी निर्णयांची आठवण करून देताना त्यांनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा उल्लेख केला, जी दादांनी २८ जून २०२४ च्या अर्थसंकल्पात मांडली होती. तसेच, शासकीय कागदपत्रांवर स्वतःच्या नावानंतर आईचे नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय दादांनीच घेतला होता. मंत्रालयात स्वतःची पाटी 'अजित आशाताई अनंतराव पवार' अशी लावून त्यांनी स्त्री-सन्मानाचा वस्तुपाठ घालून दिला होता. "दादा आज प्रत्यक्ष आपल्यात नसले, तरी ते जिथे कुठे असतील तिथून आपल्या कामावर बारकाईने लक्ष ठेवून असतील," असा विश्वास व्यक्त करत 'एकच वादा, अजित दादा' या घोषणेसह त्यांनी आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Comments
Add Comment

Prajakta Lavangare : महिला आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक प्रभावी सुविधा देण्यासाठी उपाययोजना करा

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजाचा, सुविधांचा अतिरिक्त आयुक्तांकडून आढावा मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या

MPSC Exam : MPSC परीक्षेत मोठा बदल, आता २१ दिवसांत निकाल येणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत मोठा बदल; पूर्व परीक्षा आता CBT पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा

Lokmanya Tilak road fire : लोकमान्य टिळक रोडवर आग; परिसरातील नागरिकांची पळापळ!

मुंबई : मुंबईत आगीच्या सत्रामुळे खळबळ उडाली असून, शुक्रवारी दादरच्या (Dadar) लोकमान्य टिळक रोडवर (Lokmanya Tilak Road) आगीची

Aarey Road : गोरेगाव आरे भास्कर रस्त्यांची तात्पुरती डागडुजी

स्थानिक नगरसेविकेने रस्ता खचण्याची वर्तवली भीती पावसाळ्यात पूर्वस्थितीत रस्ता आणून देताना घेतली नाही

Mumbai Police : मुंबई पोलीस अधिकारी संभाजी गुरव यांची मोठी कामगिरी; उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च डेनाली शिखर सर

मुंबई : मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक संभाजी गुरव ( Sambhaji Gurav) यांनी उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च माउंट

Suicide News: धक्कादायक! वरळी सी लिंकवरून समुद्रात उडी; ठाण्यातील व्यावसायिकाचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील (Mumbai) वरळी सी लिंकवरून (Worli Sea Link) एका व्यक्तीने समुद्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.