मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्याआधीच महाविकास आघाडीतील विसंवाद उघडपणे समोर आला आहे. ‘शिवालय’ या उबाठा गटाच्या कार्यालयात रविवारी झालेल्या विरोधकांच्या बैठकीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्यांनी बहिष्कार घातला.
सत्ताधारी महायुतीला विधिमंडळात कोंडीत पकडण्यासाठी रणनीती आखण्याच्या उद्देशाने ही बैठक बोलावण्यात आली खरी; मात्र, शरद पवार गटाच्या अनुपस्थितीचीच अधिक चर्चा रंगली. यामागे राज्यसभा निवडणुकीचे राजकारण असल्याची चर्चा आहे. उबाठा गटाने आपले संख्याबळ अधिक असल्याचा दावा करत या जागेवर हक्क सांगितला आहे, तर काँग्रेसने शरद पवार यांच्या नावाबाबत सावध भूमिका घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळेच पवारांच्या शिलेदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.
अधिवेशनापूर्वीच्या या महत्त्वपूर्ण बैठकीला आणि त्यानंतरच्या पत्रकार परिषदेलाही शरद पवार गटाने अनुपस्थिती दर्शवली. विरोधी पक्ष आधीच अस्थीपंजर झालेला असताना, या बैठकीकडे विरोधकांच्या अस्तित्वाची चाचणी म्हणून पाहिले जात होते. मात्र, राष्ट्रवादीच्या (शरद पवार) गैरहजेरीमुळे उबाठा गट आणि काँग्रेस एकाकी पडल्याचे चित्र दिसत आहे.
‘मविआ’च्या राजकीय जहाजाला गळती
एकंदरीत, ‘मविआ’ नावाच्या राजकीय जहाजाला गळती लागल्याची चिन्हे दिसत असून, प्रत्येक घटक पक्ष आपापले राजकीय गणित जुळवण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे. मात्र, या सगळ्यात विखुरलेल्या विरोधकांची विधिमंडळातील भूमिका नेमकी काय असणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.