दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलीस स्पेशल सेलने तमिळनाडूमधून सहा संशयित आतंकवाद्यांना अटक केली आहे. या व्यक्तींवर पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) आणि बांगलादेशातील दहशतवादी संघटनांच्या सूचनेवरून भारतात मोठी दहशतवादी कटकारस्थानं रचल्याचा आरोप आहे. सर्व आरोपींना तमिळनाडूमधून दिल्लीला आणले जात आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका बांगलादेशी नागरिकाचाही समावेश आहे. संशयितांकडून काही आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे.
गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर स्पेशल सेलने ही मोठी कारवाई केली. प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की, हे संशयित भारतात मोठी घटना घडवून आणण्याच्या तयारीत होते. त्यांचे पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंध असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच बांगलादेशातील दहशतवादी संघटनांच्या भूमिकेचाही तपास सुरू आहे. भारतातील शांतता भंग करणे आणि मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचवणे हा त्यांचा उद्देश होता.
संशयितांकडून अनेक मोबाईल फोन आणि सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. या उपकरणांचा वापर दहशतवादी संघटनांच्या समर्थनार्थ संदेश प्रसारित करण्यासाठी आणि संशयित हँडलर्सशी संपर्क ठेवण्यासाठी केला जात होता. जप्त केलेल्या मोबाईल आणि सिमकार्डची सखोल तपासणी करून त्यांच्या नेटवर्क, संपर्क आणि संपूर्ण कटकारस्थानाचा उलगडा करण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तमिळनाडूमधून मिजानूर रहमान, मोहम्मद शबात, उमर, मोहम्मद लितान, मोहम्मद शाहिद आणि मोहम्मद उज्जल या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण असामाजिक कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. ते पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर मजकूर पोस्ट करत होते. यापैकी दोन आरोपींना उथुकुली येथून, तीन जणांना पल्लडम येथून आणि एका आरोपीला तिरुमुरुगनपूंडी परिसरातून अटक करण्यात आली.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी बनावट आधारकार्डचा वापर करून आपली ओळख लपवत गारमेंट उद्योगात काम करत होते. कारवाईदरम्यान आठ मोबाईल फोन आणि १६ सिमकार्ड जप्त करण्यात आले. सर्व आरोपींना रेल्वेने दिल्लीला आणले जात असून पुढील तपास सुरू आहे. या आरोपींवर दहशतवाद्यांना मदत केल्याचा संशय आहे. त्यांनी अनेक शहरांची रेकी केल्याची माहितीही समोर आली आहे. तसेच दिल्लीमध्ये ‘फ्री काश्मीर’चे पोस्टर लावल्याचेही उघड झाले आहे.