ग्रामदैवतांच्या पालख्या, पारंपरिक नृत्यप्रकार, दशावतारी नाट्यप्रयोगांची तयारी अंतिम टप्प्यात
रत्नागिरी : कोकणात शिमगोत्सवाची चाहूल लागली असून गावागावांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पारंपरिक ढोल-ताशांच्या निनादात आणि रंगीबेरंगी मिरवणुकांच्या तयारीत संपूर्ण परिसर दुमदुमू लागला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्ये शिमगोत्सवाला विशेष महत्त्व आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांतील गावांमध्ये ग्रामदैवतांच्या पालख्या, पारंपरिक नृत्यप्रकार, तसेच दशावतारी नाट्यप्रयोगांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कोकणातील शिमगोत्सव हा केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक एकात्मतेचा सोहळा मानला जातो. गावांमध्ये होळीकुंडासाठी लाकूडफाटा जमा करण्याची लगबग सुरू झाली आहे. तरुणाईत विशेष उत्साह दिसून येत असून पारंपरिक वेशभूषा, मुखवटे आणि रंगोत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी वाढली आहे. अनेक ठिकाणी भजन, कीर्तन आणि जगराचीही आखणी करण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनाने सण शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त व स्वच्छतेची विशेष तयारी केली जाणार आहे. पर्यटकांचीही कोकणाकडे ओढ वाढण्याची शक्यता असल्याने पर्यटन व्यावसायालाही चालना मिळणार आहे.
कोकणवासी चाकरमान्यांच्या सेवेसाठी लालपरीही सज्ज
कोकणातील शिमगोत्सव हा लोकपरंपरा, श्रद्धा आणि आनंदाचा संगम असून या सणाच्या निमित्ताने गावागावांत बंधुभाव आणि एकोपा अधिक दृढ होताना दिसत आहे. लाखो कोकणी मुंबई, पुणेकर कोकणात येणार असल्याने लालपरीही सज्ज झाली आहे. कोकणात येण्यासाठी सुमारे १९८ जादा फेऱ्या सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळ करत आहे. होळीच्या काळात प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, वेगवान, स्वस्त व्हावा यासाठी एसटी महामंडळाने वाढीव फेऱ्या सोडण्याचे नियोजन केले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या विभागांतून तब्बल १९८ जादा फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. होळीनिमित्त हजारो प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुलभ व्हावा यादृष्टीने प्रयत्न सुरू असून, या विशेष मोहिमेत सर्वाधिक फेऱ्यांचे नियोजन ठाणे आणि मुंबई विभागांतून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
कोकण रेल्वे मार्गावर जादा फेऱ्या
कोकणासाठी ठाण्यातून ७९ फेऱ्यांचे नियोजन असून, मुंबई विभागातून ६२ फेऱ्या नियोजित आहेत. २५ फेऱ्या गट आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पालघर विभागातून २४ फेऱ्या पूर्णपणे गट आरक्षणाच्या माध्यमातून चालवण्यात येणार आहेत. रायगड विभागातून ३३ फेऱ्या होणार असून, त्या सर्व आरक्षित प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. या विशेष मोहिमेतील सर्वाधिक गर्दी २८ फेब्रुवारी आणि १ मार्च या दोन दिवशी अपेक्षित आहे. २८ फेब्रुवारी रोजी तब्बल ९१ फेऱ्या, तर १ मार्च रोजी ५९ फेऱ्या नियोजित करण्यात आले आहे. कोकण रेल्वे ही चाकरमानी पुणे व मुंबईकरांसाठी सज्ज झाली आहे. रेल्वेच्या जादा फेऱ्या कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात येणार आहे.