गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक म्हणून उभारण्यात आलेली उरलेली शेवटची ४४ स्मारके सुरक्षा दलांनी यशस्वीरित्या उद्ध्वस्त केली. याबद्दल गडचिरोलीतील पोलीस दलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले. पोलिसांची ही कारवाई केवळ भौतिक संरचना हटवण्यापुरती मर्यादित नसून, अनेक वर्षे जनतेच्या मनावर निर्माण झालेल्या भीतीच्या मानसिकतेवर लोकशाहीने मिळवलेला निर्णायक विजय आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
माओवाद्यांकडून दुर्गम आणि अतिदुर्गम भागात स्मारके उभारली गेली होती, ज्यांचा उद्देश स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे आणि आपले अस्तित्व दाखवणे हा होता. मात्र, शासनाच्या सातत्यपूर्ण आणि ठाम माओवादविरोधी धोरणामुळे गडचिरोलीतील परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. सुरक्षा कारवाया, आत्मसमर्पण धोरण, विकास प्रकल्प आणि स्थानिक जनतेचा विश्वास वाढला आहे.
याच पार्श्वभूमीवर, गडचिरोली पोलीस दल, सी-६० कमांडो, सीआरपीएफ आणि विशेष पथकांच्या संयुक्त मोहिमेत सुमारे ८०० जवानांनी नियोजनबद्ध शोध आणि तपासणी मोहीम राबवली. बीडीडीएस पथकाच्या तपासणीनंतर विविध जंगल परिसरातील ही ४४ स्मारके नेस्तनाबूत केली. एटापल्ली, हेडरी, भामरागड, जिमलगट्टा, धानोरा आणि पेंढरी उपविभागांतील ही कारवाई विशेषतः संवेदनशील भागात पार पडली. जिथे पूर्वी दहशतीचे प्रतीक उभे होते, तिथे आता प्रशासनावरील विश्वास आणि विकासाची आशा निर्माण झाली आहे. ही कारवाई गडचिरोलीतील बदलत्या वास्तवाचे प्रतीक आहे. भीतीपासून विश्वासाकडे, हिंसेपासून विकासाकडे होणाऱ्या संक्रमणाचा हा निर्णायक टप्पा आहे.