ठाणे : ठाणे महापालिकेत महायुतीने सत्ता स्थापन केली आहे. ठामपामध्ये ३३ प्रभाग आणि १३१ जागा आहेत. यातील ७५ जागांवर शिवसेना आणि २८ जागांवर भाजपचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ जण निवडून आले आहेत. उबाठा एका जागेवर तर इतर १२ जागांवर विजयी झाले आहेत. शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोळकर यांनी महापौर तर भाजपच्या कृष्णा पाटील यांनी उपमहापौर पदाची सूत्रं स्वीकारली आहेत. या पार्श्वभूमीवर उपमहापौर कृष्णा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मुंबई प्रमाणेच ठाण्याच्या विकासासाठी टीएमआरडीए स्थापन करण्याची मागणी केली आहे.
मुंबई आणि भोवतालच्या शहरांच्या विकासाकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची अर्थात एमएमआरडीएची स्थापना करण्यात आली आहे. याच पद्दतीने आता ठाणे जिल्ह्यातील सर्व शहरांच्या आणि भोवतालच्या गावांच्या विकासाकरिता टीएमआरडीए स्थापन करण्याची मागणी कृष्णा पाटील यांनी केली आहे. अद्याप या मागणीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी उत्तर दिलेले नाही. पण या मागणीवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ठाणे जिल्ह्यात आणि ठाणे मनपात शिवसेनेचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व कमी करण्याच्या हेतूने टीएमआरडीए स्थापन करण्याची मागणी भाजपने केल्याची चर्चा आहे. भाजपने हे आरोप फेटाळले आहेत आणि विकासाला गती देण्याच्या हेतूने टीएमआरडीएची मागणी केल्याचे सांगितले आहे.
उपमहापौर कृष्णा पाटील यांनी पत्रातून प्रस्तावित केलेल्या टीएमआरडीएचे हेतू काय असतील ?
- शहराच्या डेव्हलपमेंट प्लॅनवर लक्ष ठेवून त्याची पारदर्शक अंमलबजावणी करणे
- बिल्डरधार्जिण्या निर्णयांना चाप लावणे, सामान्यांच्या हिताची गृहनिर्माण धोरणे राबवणे
- शहर विकास विभागातील भ्रष्टाचाराला लगाम घालून कामात पारदर्शकता आणणे
- अनधिकृत बांधकामे, फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी यांसारख्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधणे
- नागरी सोयीसुविधांचा दर्जा सुधारून ठाणेकरांचे जीवनमान उंचावण्यावर भर देणे