नवी दिल्ली: राजस्थानच्या अलवार जिल्ह्यातील भिवाडी औद्योगिक क्षेत्रात सोमवारी एका बेकायदेशीर फटाका कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत किमान ८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून अजूनही दोन कामगार कारखान्यात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेवर पंतप्रधान मोदी यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "राजस्थानमधील भिवाडी येथील ही आगीची घटना अतिशय दुःखद आहे. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. जे जखमी झाले आहेत त्यांना लवकर बरे वाटावे यासाठी मी प्रार्थना करतो."
पंतप्रधानांसह मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा म्हणाले, "खुशखेडा औद्योगिक क्षेत्रातील जीवितहानी अत्यंत दुःखद आहे. मृतांच्या आत्म्यांना शांती आणि जखमींच्या लवकर बरे होण्याकरिता मी देवाकडे प्रार्थना करतो. ओम शांती."
माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, "भिवाडी (खैरथल-तिजारा) येथील रासायनिक कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू अत्यंत दुःखद आहे. देव मृतांच्या आत्म्यांना शांती देवो आणि जखमींना लवकर बरे होवो."
ज्यावेळी ही दुर्घटना घडली, तेव्हा कारखान्यात सुमारे २५ कामगार उपस्थित होते. आगीची बातमी समजताच शेजारील कारखान्यांमधील कामगारांनी सुरक्षिततेसाठी बाहेर धाव घेतली. कारखान्याच्या मालकाने ही जागा भाड्याने दिली होती, जिथे भाडेकरू बेकायदेशीररित्या फटाके तयार करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कारखान्यात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या दारूगोळा आणि कार्डबोर्डमुळे एका भीषण स्फोटानंतर आग झपाट्याने पसरली. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून आसपासचे कारखाने रिकामे करण्यात आले आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आगीदरम्यान ३ ते ४ मोठे स्फोट झाले, ज्यामुळे नागरिक आणि कामगारांमध्ये भीती निर्माण झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासनतास प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवले असून सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.