महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे
पद्मपुराण हे १८ पुराणांपैकी एक असून प्रामुख्याने विष्णुभक्तीवर आधारित आहे. सर्वच पुराणातून जीव, सृष्टी, पाप-पुण्य, देवता, राक्षस यांच्या कथा सांगितल्या आहेत. पुराणे ही ब्रह्मदेवाने सांगितली व व्यासांनी त्यांना ग्रंथरूप दिले असे मानले जाते.
या पद्म पुराणात तुलसीदलाच्या महात्म्यासंबंधी एक कथा आहे. ही कथा नारदाने पृथू राजाला सांगितली असा उल्लेख आहे. पद्मपुराणानुसार पूर्वीच्या काळी करवीर प्रदेशात एक धर्मदत्त नावाचा ब्राह्मण राहत होता. तो विष्णू भक्त होता. तो नेहमी तुलसीदलाने विष्णूंची पूजा करीत असे. तसेच ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः! या मंत्राचा जप करीत असे. तो येणाऱ्या जाणाऱ्यांचा नेहमीच आनंदाने आदरसत्कार करीत असे. एके दिवशी मोठ्या पहाटे ब्रह्मप्रहरी तो विष्णुपूजनासाठी पूजा साहित्य घेऊन मंदिरात जाण्यासाठी निघाला. वाटेत त्याला एक महाभयंकर राक्षशीण दिसली. तांबड्या डोळ्यांची ती महाभयंकर राक्षशीण पाहून धर्मदत्त भीतीने थरथर कापू लागला. त्याने विष्णू नाम स्मरण सुरू केले. भीतीने थरथर कापत नाम स्मरण करत असतांना धर्मदत्ताच्या हातातील पूजा साहित्यातील तुलसीदलमिश्रित जल राक्षशीणीच्या अंगावर पडले. तुलसी मिश्रित जल अंगावर पडताच राक्षसशीणीच्या देहाचा नाश होऊन त्या ठिकाणी मानव देह धारी स्त्री प्रकट झाली.
तिला पाहून धर्मदत्त आश्चर्यचकित झाला. त्याने तिला तू कोण? म्हणून विचारले असतात ती म्हणाली “मी सौराष्ट्र नगरात राहणाऱ्या एका द्विजाची पत्नी असून माझे नाव कलह असे आहे. मी नेहमी सर्वांशी भांडत असे, तसेच पतीशीही भांडण करून त्याला त्रास देत असे, मी कोणालाच चांगले अन्न देत नव्हती, ते सर्व मीच एकटी खात असे, त्यामुळे माझे पती अत्यंत दुःखी राहत असे. अखेर त्याने दुसरा विवाह केला. त्यामुळे मी चिडून विष प्राशन करून आत्महत्या केली. मी कोणतेही संत्कृत्य केलेले नसल्याने माझी रवानगी प्रेत योनीत करण्यात आली व तेव्हापासून मी सर्वत्र प्रेत योनीत भटकत असून भुकेने व्याकूळ असते. या नगरीत अशीच भटकत असताना तुमची भेट झाली व माझ्या अंगावर पडलेल्या तुळशीदल मिश्रित जलामुळे माझी मुक्तता झाली व मला मानव देह प्राप्त झाला. तेव्हा आता मला मुक्ती कशी मिळेल याबाबत मार्गदर्शन करावे? अशी तिने विनंती केली.
धर्मदत्त म्हणाला “तीर्थ, दान अथवा व्रताच्या साह्याने पल्या पापकर्माचा नाश करता येतो; परंतु आजपर्यंत प्रेत योनीत असल्याने तुझ्याकडून कोणतेच पूण्य कर्म घडले नाहीत. तेव्हा मी मिळविलेल्या पुण्यापैकी थोडे पुण्य तुला देतो, त्यामुळे तुझा उद्धार होईल व तुला पूर्व शरीर प्राप्त होईल, असे म्हणून त्याने तिच्या अंगावर तुलसीदल मिश्रित जल पुन्हा प्रोक्षण केले. त्यायोगे तिच्या पापकर्माचा नाश होऊन तिला शुद्ध शरीर प्राप्त झाले.
पद्मपुराणानुसार सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून विष्णुसहस्त्रनामाचे चिंतन केल्यास जीवनात सुख, शांती, समृद्धी येऊन आयुष्य वाढते व वैभव प्राप्त होते. विष्णूच्या प्रत्येक नामासोबत तुळशीचे एक एक पान वाहून विष्णूची पूजा केल्यास एक कोटी यज्ञाचे पुण्य प्राप्त होते. काम करताना अथवा चालता बोलतांनाही विष्णू सहस्त्रनाम घेतल्यास दोष लागत नाही.







