कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये पाकिस्तान विरूद्धचा साखळी सामना भारताने ६१ धावांनी जिंकला. या विजयामुळे अ गटातून पुढील फेरीसाठी (सुपर एट) भारत पात्र झाला आहे. भारताने अमेरिका, नामिबिया आणि पाकिस्तान या तिन्ही संघांविरूद्धचे साखळी सामने जिंकले. आता भारताचा बुधवार १८ फेब्रुवारी रोजी नेदरलँड विरुद्ध साखळी सामना आहे. पण या सामन्याआधीच भारत सुपर एट फेरीसाठी पात्र झाला आहे.
प्रेमदासा स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारताने २० षटकांत सात बाद १७५ धावा केल्या. धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानचा डाव १८ षटकांत ११४ धावांवर आटोपला. पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात ४० चेंडूत ३ षटकार आणि १० चौकार मारत ७७ धावा करणारा ईशान किशन सामनावीर झाला. त्याने यंदाच्या वर्ल्डकपमधील सलग दुसरे अर्धशतक केले. याआधी ईशानने नामिबिया विरूद्धच्या सामन्यात ६१ धावांचे योगदान दिले होते.
पाकिस्तानची फलंदाजी
भारताने दिलेल्या १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने शून्य, सईम अयुबने ६, सलमान आगाने ४, बाबर आझमने ५, उस्मान खानने ४४, शादाब खानने १४, मोहम्मद नवाजने ४, फहीम अशरफने १०, शाहीन आफ्रिदीने नाबाद २३, अबरार अहमदने शून्य आणि उस्मान तारिकने शून्य धावांचे योगदान दिले. भारताकडून हार्दिक पंड्या, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तर कुलदीप यादव आणि तिलक वर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारताची फलंदाजी
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्यामुळे भारतच प्रथम फलंदाजीसाठी आला. भारताकडून ईशान किशनने सर्वाधिक ७७, अभिषेक शर्माने शून्य, तिलक वर्माने २५, सूर्यकुमार यादवने ३२, हार्दिक पंड्याने शून्य, शिवम दुबेने (धावबाद) २७, रिंकू सिंगने नाबाद ११, अक्षर पटेलने नाबाद शून्य धावा केल्या. पाकिस्तानकडून सईम अयुबने तीन तर सलमान आगा, उस्मान तारिक आणि शाहीन आफ्रिदीने प्रत्येकी एक विकेट घेतली.
'ई'शान शो!
ईशान किशनने फलंदाजीतील शानदार शो दाखवून दिला. त्याने दबावात तुफान फटकेबाचीचा नजराणा पेश करत अवघ्या २७ चेंडूत अर्धशतक झळकावले. ईशान किशनचे या टी ट्वेंटी विश्वचषकातील हे दुसरे अर्धशतक होते. त्याची ही खेळी भारतासाठी मोठा दिलासा देणारी आणि पाकिस्तानी गोलंदाजांचे खांदे पाडणारी अशी आहे. या खेळीसह त्याने यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. एवढेच नाही तर भारत-पाकिस्तान यांच्यातील टी-२० सामन्यात त्याच्या भात्यातून तिसरे जलद अर्धशतक पाहायला मिळाले. भारतीय संघाने पहिल्या षटकात पहिली विकेट गमावल्यावरही ईशान किशन याने आपल्या नैसर्गिक धाटणीत तुफान फटकेबाजी करत पाकिस्तानी गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलले. तो शतकी खेळीसह मोठा धमाका करेल, असे चित्र निर्माण झाले असताना भारताच्या डावातील ९ व्या षटकात सईम अयूबच्या चौथ्या चेंडूवर त्याने आपली विकेट गमावली. ८८ धावांवर भारताने ही विकेट गमावली. त्याने ४० चेंडूत ७७ धावा केल्या.
ईशान किशन टी वर्ल्डकप २०२६ मधील कामगिरी
- ७ फेब्रुवारी विरुद्ध अमेरिका - २० धावा
- १२ फेब्रुवारी विरुद्ध नामिबिया - ६१ धावा
- १५ फेब्रुवारी विरुद्ध पाकिस्तान - ७७ धावा