कोलंबो: आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये रविवार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे. हा यंदाच्या वर्ल्डकपमधील २७ वा साखळी सामना असेल. क्रिकेटप्रेमींचे लक्ष असलेल्या या हायव्होल्टेज सामन्याआधीच एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील भारत - पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट घोंगावत आहे. यामुळे क्रिकेटप्रेमी चिंतेत आहेत.
अशातच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मावर टीका केली आहे. मोहम्मद आमिरने अभिषेकला चक्क 'स्लॉगर' असे संबोधले आहे. पाकिस्तानी वाहिनीवरील 'हारना मना है' या कार्यक्रमात बोलताना आमिरने अभिषेकच्या तांत्रिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
काय म्हणाला मोहम्मद आमिर:
"मी जितके त्याला पाहिले आहे, त्यावरून तो प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतो. त्याचा दिवस असेल तर तो मोठी खेळी करेल, अन्यथा अपयशाची शक्यता जास्त असते. तो तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण फलंदाज वाटत नाही," असे आमिरने आपले मत व्यक्त केले. त्याने पुढे सांगितले की, अभिषेकला रोखायचे असेल तर त्याच्यावर शरीरावर गोलंदाजी करणे प्रभावी ठरू शकते. चेंडू स्विंग होत असताना तो कसा खेळतो, हे पाहिल्यावरच त्याला खरा दर्जेदार फलंदाज मानता येईल, असेही आमिरने म्हटले.
दरम्यान, अभिषेक शर्मा सध्या पोटाच्या संसर्गातून सावरत आहे. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात तो खेळू शकता नव्हता. अमेरिकेविरुद्ध फलंदाजीत तो पोटाच्या विकारामुळे अस्वस्थ दिसत होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याचे सुमारे दोन किलो वजनही घटल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो खेळणार की नाही, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
भारत-पाकिस्तान (Ind vs Pak) सामन्यापूर्वी आमिरच्या वक्तव्यामुळे वातावरण आणखी तापले आहे. आता अभिषेक मैदानात उतरल्यास तो आपल्या कामगिरीतून टीकेला कसे उत्तर देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







