अजितदादा काय कारणाने पक्षातून बाहेर पडले याची अत्यंत खोटी,चुकीची,दिशाभूल करणारी माहिती त्या लेखामध्ये...
अजितदादा हयात असताना त्यांची चुकीची एक प्रतिमा तयार करण्यात आली आणि आता दुर्दैव असे की, दादांच्या अचानक जाण्यानंतरदेखील त्यांच्या विरोधातले हे षडयंत्र चालू...
दादांच्या मृत्यूनंतर हे घाणेरडे राजकारण केले जात असून यापुढे केलेल्या प्रत्येक आरोपाला सडेतोड उत्तर पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी देतील...
मुंबई : शरदचंद्र पवार गटाचे दर महिन्याला प्रसिद्ध होणाऱ्या मासिकामध्ये प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नावाने आलेल्या आर्टिकलचा आणि शशिकांत शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी निषेध केला आहे.
दरम्यान आमच्या नेत्या, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, त्यांचे दोन्ही पुत्र पार्थ दादा, जय दादा, या कुटुंबाची जाहीर माफी शशिकांत शिंदेंनी मागितली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका आनंद परांजपे यांनी व्यक्त केली.
जी भूमिका सातत्याने गेली अनेक वर्ष अजितदादा पवार पक्षाच्या अंतर्गत बैठकांमध्ये घेत होते, तीच भूमिका वेळोवेळी सर्वोच्च नेतृत्वाने देखील दादांना बरेचदा पुढे जाण्यासाठी सांगितली, पण अचानक ते निर्णय होत नव्हते, ती भूमिका अजितदादा पवार यांनी घेतली हेही आनंद परांजपे यांनी सांगितले.
अजितदादा हयात असताना पक्षामध्ये कशाप्रकारे त्यांची चुकीची एक प्रतिमा तयार करण्यात आली आणि आता दुर्दैव असे की दादांच्या अचानक जाण्यानंतर देखील त्यांच्या विरोधातले हे षडयंत्र चालू आहे याबद्दल तीव्र नाराजी आनंद परांजपे यांनी व्यक्त केली.
अजितदादा काय कारणाने पक्षातून बाहेर पडले, याची अत्यंत खोटी, चुकीची, दिशाभूल करणारी माहिती त्या लेखामध्ये आहे, म्हणूनच त्याचा निषेध करत असल्याचे आनंद परांजपे म्हणाले.
शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी जो लेख लिहिला होता त्या लेखामध्ये अजितदादांबद्दल अत्यंत चुकीच्या पद्धतीने काही ओळी होत्या.अदृश्य शक्तींच्या कारवाया, धमक्या, खोट्या-नाट्या षडयंत्रामुळे अजितदादा पवार यांना पक्षातून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला' आणि 'येणाऱ्या चार-पाच महिन्यांमध्ये ती चूक पुन्हा सुधारायची. खरंतर पक्ष एकत्र असताना अजितदादा पवार अनेक वेळा पक्षातील बैठकींमध्ये 'भारतीय जनता पार्टी बरोबर जावे' ही भूमिका त्यांची असायची. शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील ही भूमिका स्पष्ट केली. २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर भारतीय जनता पार्टी ज्यावेळेला सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला त्यावेळेला बाहेरून समर्थन देण्याचा निर्णय देखील त्यापैकीच एक होता.त्यानंतर २०१६ असेल,२०१७ असेल ते अगदी २०१९ चा सकाळचा शपथविधी असेल, त्यावेळेला देखील अजितदादा पवारांची भूमिका ही भारतीय जनता पार्टीबरोबर जाऊन दोन पक्षांचे स्थिर सरकार बनेल, अशा प्रकारची होती. अगदी २ मे २०२३ रोजी ज्यावेळेला शरदचंद्र पवारांचा राजीनामा झाला आणि ज्या पद्धतीने वेळोवेळी पक्ष एकत्रित असताना अजितदादा पवारांना चुकीच्या पद्धतीने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसमोर त्यांची एक इमेज तयार करण्यात आली, हे कुठल्या प्रकारचे षडयंत्र त्यावेळेला त्या पक्षामध्ये होते? असा संतप्त सवालही आनंद परांजपे यांनी केला आहे.
दिनांक २ जुलै २०२३ रोजी पक्षातून बाहेर पडून भारतीय जनता पार्टीबरोबर सत्तेत जाण्याचे शिवसेनेबरोबर ठरवले, त्यावेळेला कुठलाही त्यांच्यावर दबाव नव्हता, कुठलेही षडयंत्र त्यांच्या मागे लागले नव्हते हेही आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.
खोटं नातं वेळोवेळी अजितदादा पवारांबद्दल सांगितले गेले. आजही त्यांच्या मृत्यूनंतर हे घाणेरडे राजकारण केले जात आहे. याच्यापुढे केलेल्या आरोपाला सडेतोड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी देतील असा स्पष्ट इशारा आनंद परांजपे यांनी दिला आहे.
अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी, दुःखद निधनानंतर अंत्यसंस्कार व्हायच्या आधीच शरदचंद्र पवार गटाकडून ठरवून प्रतिक्रिया देण्यात आल्या. विलीनीकरण होणार आहे. तारीख देखील १२ फेब्रुवारीची डिक्लेअर करण्यात आली. म्हणजे एकीकडे आम्ही आमचं सर्वस्व गमावले होते, महाराष्ट्राचे न भरून येणारे नुकसान झाले होते आणि त्या वेळेला आपल्या राजकीय स्वार्थासाठी विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या. विलीनीकरणाबाबतची स्पष्ट भूमिका आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी मांडली होती. त्यामुळे विलीनीकरणाचा विषय सध्या तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये पक्षासमोर नाही असेही आनंद परांजपे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
अजितदादा पवार हे जिवंत असताना पक्षामध्ये ज्यावेळेस पक्ष एकत्रितपणे होता, त्यावेळेला २०१४ असेल, १६ असेल, १७ असेल, १९ असेल ते २०२३ दोन मे चा शरदचंद्र पवार यांचा राजीनामा असेल. वेळोवेळी अजितदादा पवारांची प्रतिमा एक वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्रासमोर आणि कार्यकर्त्यांसमोर मलीन करण्यात आली असा थेट हल्लाबोलही आनंद परांजपे यांनी केला आहे.
गेले काही दिवस सातत्याने राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचे काम केले जात आहे. विधीमंडळाची बैठक घेऊन उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवारांची विधिमंडळाचे नेतेपदी एकमुखाने निवड झाली. त्यांची उपमुख्यमंत्री पदाची शपथ झाली. त्याच्यावरुनही राजकारण करण्यात आले. त्यामुळे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या दोन्ही नेत्यांना आणि आमच्या सर्वोच्च नेत्या सुनेत्रा पवारांना देखील शपथ लवकर का घेतली? काय घाई होती? अशा प्रकारचे आरोप सातत्याने केले जात आहेत असेही आनंद परांजपे म्हणाले.
आमच्या पक्षावर जी शोककळा आलेली आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली आहे. अजितदादा पवारांच्या जाण्याने न भरून येणारे जे नुकसान झाले आहे. याच्यातूनच आम्ही कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सावरतो आहे. आम्हालाच अजून धीर देण्याची गरज असताना ज्याप्रकारचे गलिच्छ राजकारण केले जात आहे याचाही आनंद परांजपे यांनी निषेध केला आहे.
दादांचा अग्निसंस्कार व्हायच्या आधीच ठरवून की काय? शरदचंद्र पवार गटाच्या नेत्यांनी २८ तारखेला रात्रीच मुलाखती द्यायला सुरुवात केली. म्हणजे महाराष्ट्र या दुःखातून सावरतदेखील नव्हता, कार्यकर्त्यांनी आमचे सर्वस्व गमावले होते.त्यावेळेला जाणीवपूर्वक की काय? विलीनीकरणाच्या चर्चा आल्या. जे काही राजकारण गेल्या काही दिवसांपासून चालू आहे, हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने, महाराष्ट्राची ही संस्कृती नाही याची जाणीव आनंद परांजपे यांनी शरदचंद्र पवार गटाला करुन दिली आहे.
बारामती येथे झालेल्या विमान अपघाताची चौकशी 'एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो' (AAIB) करत आहे. लवकरच याचा प्राथमिक अहवाल येईल मात्र अपघाताच्या चौकशीचा अहवाल येण्यापूर्वीच त्याला राजकीय रंग देणे चुकीचे आहे असे सांगतानाच खुद्द रोहित पवारांनी देखील यापूर्वी त्याच कंपनीच्या विमानाने प्रवास केल्याचा उल्लेख आनंद परांजपे यांनी केला. दरम्यान इतर पक्षातील नेत्यांच्या टीकेकडे राष्ट्रवादी काँग्रेस फारसे लक्ष देत नसल्याचेही आनंद परांजपे यांनी सांगितले.