ठाणे: शहापूर नगरपंचायतीच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पुरेसे व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी ठाणे येथे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
शहापूर नगरपंचायत महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार स्थापन झाल्यानंतर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. सन १९८३ मधील जुनी पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाल्याने नागरिकांना पुरेसे व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे कठीण झाले आहे. शहराची भावी वाढ व सन २०४४ पर्यंतची पाण्याची गरज लक्षात घेऊन भातसा नदी या स्त्रोतावर आधारित नवीन पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली असल्याचे आमदार डावखरे यांनी निवेदनात नमूद केले.
नगरपंचायतीने आवश्यक ठराव करून पाणी आरक्षणाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून, काही खासगी प्रकल्पांचे पाणी आरक्षण रद्द झाल्यानंतर उपलब्ध झालेल्या सुमारे २.५७ दलघमी/वर्ष पाणी आरक्षण शहापूर नगरपंचायतीस देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आलेला आहे.
आमदार डावखरेंनी निवेदनात काय म्हटले?
आमदार निरंजन डावखरे यांनी निवेदनात म्हटले की, "शहापूर नगरपंचायत ही महाराष्ट्र शासनाच्या दि. ११ मार्च २०१५ च्या अधिसूचनेनुसार नव्याने स्थापन झालेली नगरपंचायत असून शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सन १९८३ मध्ये अस्तित्वात आलेली जुनी पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाल्याने नागरिकांना पुरेसे व स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविणे शक्य होत नाही. शहराची भावी वाढ व सन २०१४ पर्यंतची पाण्याची गरज लक्षात घेता, भातसा नदी या खात्रीशीर उद्भवावरून नवीन पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आलेली आहे. नगरपंचायतीने याबाबत आवश्यक ठराव करून पाणी आरक्षणाचा प्रस्ताव सादर केला आहे. संदर्भीय पत्रानुसार काही खासगी प्रकल्पांचे पाणी आरक्षण रद्द झालेले असून त्यापैकी २.५५ दलघमी/वर्ष पाणी आरक्षण शहापूर नगरपंचायतीस देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आलेला आहे. सदर प्रस्ताव अत्यंत लोकहिताचा असल्याने त्यास तातडीने मंजुरी देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, ही विनंती".