नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. 'अ' गटातील दुसऱ्या सामन्यात भारताचा सामना नामिबिया विरुद्ध गुरुवारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे. अमेरिकेने पहिल्या सामन्यात भारताला दिलेली कडवी झुंज पाहता, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि कंपनी आता नामिबियाला हलक्यात घेण्याची चूक करणार नाही. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात अमेरिकेने भारताच्या तोंडचे पाणी पळवले होते. एका क्षणी भारताची अवस्था ६ बाद ७७ अशी बिकट झाली होती. मात्र, कर्णधार सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूत ८४ धावांची झंझावाती खेळी करत भारताला ९ बाद १६१ धावांपर्यंत पोहोचवले. त्यानंतर मोहम्मद सिराज (३ बळी), अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने २९ धावांनी विजय मिळवला. वानखेडेच्या खेळपट्टीवर भारताच्या फलंदाजीतील त्रुटी समोर आल्या होत्या. नामिबियाचा संघ अनपेक्षित धक्का देण्यासाठी ओळखला जातो, त्यामुळे भारतीय संघ आपली 'बॅटिंग ऑर्डर' अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नात असेल. दिल्लीची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते, त्यामुळे येथे मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे. तसेच भारतीय संघ या सामन्यात विजय मिळवून आपले 'सुपर ८' मधील स्थान अधिक भक्कम करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
अभिषेक शर्मा सामन्याला मुकणार?
दरम्यान भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा याला पोटाच्या तीव्र संसर्गामुळे दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आजारपणामुळे गुरुवारी होणाऱ्या नामिबीयाविरुद्धच्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता धूसर आहे. अभिषेक शर्माला मंगळवारी रात्री प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात हलवण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यावेळीही त्याला ताप होता, मात्र तरीही तो मैदानात उतरला होता. त्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणासाठीही मैदानात येऊ शकला नव्हता. सध्या त्याची प्रकृती स्थिर असली तरी डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय-व्होल्टेज सामना होणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी अभिषेक पूर्णपणे तंदुरुस्त व्हावा, यासाठी संघ व्यवस्थापन त्याला नामिबीयाविरुद्ध विश्रांती देण्याच्या विचारात आहे.
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर
नामिबिया : गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), झेन ग्रीन, बर्नार्ड स्कोल्ट्झ, रुबेन ट्रम्पेलमन, जेजे स्मित, जॅन फ्रायलिंक, लॉरेन स्टीनकॅम्प, मालन क्रुगर, निकोल लॉफ्टी-ईटन, जॅक ब्रासेल, बेन शिकोंगो, जेसी बाल्ट, डिलन लीच्टर, डब्ल्यूपी मायबर्ग, मॅक्स हिंगो.
नामिबियाविरुद्ध भारताचे ‘मिशन रन रेट’
टी-२० विश्वचषक २०२६ मधील आपल्या दुसऱ्या लढतीसाठी भारतीय संघ सज्ज झाला असून आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारताचा सामना नामिबियाशी होणार आहे. पहिल्या सामन्यात अमेरिकेने दिलेल्या कडव्या झुंजीमुळे भारताने आता सावध पवित्रा घेतला असून, नामिबियाला ‘दुबळा’ समजण्याची चूक संघ करणार नाही. नेट रन रेट सुधारण्याचे मोठे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून भारत संघ आज मैदानात उतरेल.
सलामीवीर अभिषेक शर्मा पोटाच्या विकारामुळे आजच्या सामन्याला मुकण्याची दाट शक्यता आहे. पहिल्या सामन्यात ‘गोल्डन डक’वर बाद झाल्यामुळे त्याच्या फॉर्मवरही चर्चा होती. त्याच्या जागी अनुभवी संजू सॅमसनला संधी मिळण्याचे संकेत आहेत. जर संजू खेळला, तर तो इशान किशनसोबत डावाची सुरुवात करेल, ज्यामुळे भारताची सलामी अधिक भक्कम होईल. भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराह आता पूर्णपणे तंदुरुस्त असून त्याचे संघात पुनरागमन निश्चित मानले जात आहे. यामुळे अर्शदीप सिंग आणि बुमराह अशी जोडी नामिबियाच्या फलंदाजांवर तुटून पडेल. तसेच, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर संघात परतल्याने रिंकू सिंगला विश्रांती दिली जाऊ शकते. सुंदरच्या समावेशामुळे भारताला फलंदाजीसोबतच फिरकीचा एक अतिरिक्त आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे नामिबियाने आपला पहिला सामना नेदरलँड्सविरुद्ध गमावला असला, तरी भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध चांगली कामगिरी करून आत्मविश्वास मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, भारताला केवळ विजयच नको, तर तो मोठ्या फरकाने विजय मिळवून आपला नेट रन रेट उंचावायचा आहे, जेणेकरून ‘सुपर-८’चा रस्ता सोपा होईल. मात्र कर्णधार सूर्यकुमार यादव याही सामन्यात झंझावती खेळी कायम राहतो का ते पाहण्यासारखे असेल. फलंदाजित कर्णधार सुर्यकुमार यादव, संजू सॅमसन, ईशांत किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अशी मजबूत फलंदाजी भारताकडे आहे. गोलंदाजीत अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर असे चांगले गोलंदाज भारताकडे आहेत. नामिबिया हा नवखा संघ असून त्याच्याकडे गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), झेन ग्रीन, बर्नार्ड स्कोल्ट्झ, रुबेन ट्रम्पेलमन, जेजे स्मित, जॅन फ्रायलिंक, लॉरेन स्टीनकॅम्प, मालन क्रुगर, निकोल लॉफ्टी-ईटन, जॅक ब्रासेल असे खेळाडू आहेत. भारतीय संघाला आजच्या सामन्यात विजय मिळवून नेट रनरेट वाढवावा लागेल.