संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून बीड जिल्ह्यात आणखी ११ वसतिगृहे उभारणीस शासनाकडून १५९.३६ कोटी रुपये निधी उपलब्ध!
दिवंगत अजित पवार यांनी बीड येथील ऊसतोड कामगार मेळाव्यात धनंजय मुंडेना दिला होता शब्द!
मुंबई (प्रतिनिधी) - लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या अंतर्गत तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सुरू केलेल्या संत भगवान बाबा शासकीय वसतीगृह योजनेला व्यापक स्वरूप प्राप्त होत असून धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.
धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय मंत्री असताना २५ जून, २०२१ रोजी या योजनेची घोषणा करून प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू केली होती. त्यामुळे मुंडे जनक असलेल्या संत भगवान बाबा शासकीय वसतीगृह योजनेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये शंभर क्षमतेचे मुलींसाठी एक व मुलांसाठी एक असे एकूण २२ वसतीगृह मंजूर करून भाड्याच्या जागेत सुरू करण्यात आलेले आहेत. दरम्यान त्यापैकी आतापर्यंत तीन वसतीगृहांना स्वतःची जागा व निधी मिळालेला असून त्याचे बांधकाम प्रगतीपथावर असून, उर्वरित १९ पैकी ११ वसतीगृहांसाठी जागेसह १५९ कोटी छत्तीस लाख रुपयांचा निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाच्या वतीने निर्गमित करण्यात आला आहे.
ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातात भविष्यात कोयत्याच्या ऐवजी वही, पुस्तक आणि पेन यावेत असे स्वप्न उराशी बाळगून धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय मंत्री असताना संत भगवान बाबा शासकीय वसतीगृह योजनेची घोषणा करत सुरुवात केली होती. त्या अंतर्गत ऊसतोड कामगारांची सर्वाधिक संख्या असलेल्या राज्यातील ४१ तालुक्यांमध्ये ८२ वसतीग्रह सुरू करण्याची घोषणा धनंजय मुंडे यांनी करून बीड जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये प्रत्येकी दोन याप्रमाणे २२ वसतीग्रहे भाड्याच्या जागेत सुरू केली होती.
दरम्यान यापैकी तीन वसतीगृहे ही स्वतःच्या जागेमध्ये उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून आता आणखी उर्वरित १९ पैकी ११ वसतीगृहांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये परळी सह पाटोदा, गेवराई, केज, माजलगाव या तालुक्यातील प्रत्येकी दोन तर बीड तालुक्यातील एक वसतिगृह उभारले जाणार आहे. तर प्रयत्न वसतिगृह उभारणीसाठी सुमारे १४ कोटी ५५ लाख रुपये इतका निधी खर्च केला जाणार आहे.
अजितदादांचा शब्द अन् मुंडेंची कृतज्ञता:
काही दिवसांपूर्वी बीड जिल्हा दौऱ्यावर असताना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांनी बीड येथे आयोजित एका ऊसतोड कामगारांच्या मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे यांनी आजपर्यंत ऊसतोड कामगारांसाठी केलेल्या कामाचे कौतुक करतानाच संत भगवान बाबा शासकीय वसतीगृह योजनेतून सर्व ११ तालुक्यांमध्ये बावीस वसतीगृह ही स्वतःच्या जागेत उभारून देऊ व त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असा शब्द दिला होता, तो शब्द आता पूर्णत्वाकडे जात असून धनंजय मुंडे यांनी अजितदादा पवार यांची आठवण काढत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचेही आभार व्यक्त केले आहेत.