Mumbai-Pune ExpressWay : चक्क भाजलेल्या हातांनी रोखला मृत्यू! पेरूच्या खुट्टीनं टळला मोठा अनर्थ; एक छोटी चूक अन् १० किमीचा परिसर झाला असता खाक

मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर नुकत्याच झालेल्या महाभीषण वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. तब्बल ३२ तास हजारो नागरिक अन्नापाण्याविना महामार्गावर अडकून पडले होते. या घटनेनंतर प्रशासकीय नियोजनाचा पुरता फज्जा उडाल्याची टीका सर्वच स्तरांतून होत असतानाच, आता या प्रकरणामागील एक धक्कादायक आणि तितकीच महत्त्वाची माहिती समोर येत आहे.



'प्रोपोलिन' वायू गळतीमुळे एक्स्प्रेस वे ठप्प


मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेली अभूतपूर्व वाहतूक कोंडी ही केवळ तांत्रिक बिघाड नसून एका भीषण संकटाची चाहूल होती. या महामार्गावर प्रोपोलिन वायू वाहून नेणाऱ्या टँकरचा भीषण अपघात झाला आणि त्यातून धोकादायक वायूची गळती सुरू झाली. हा वायू अत्यंत ज्वलनशील असल्याने संपूर्ण महामार्ग जणू काही स्फोटकाच्या ढिगाऱ्यावर उभा होता. ही भीषण दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवली, ज्यामुळे प्रवाशांना ३२ तास ताटकळत राहावे लागले. या घटनेत टँकर चालकाचे शौर्यही समोर आले आहे. प्रोपोलिन हा वायू उणे -२० ते -२३ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानात असतो. गळती रोखण्यासाठी चालकाने स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता हाताने प्रयत्न केला, ज्यामध्ये त्याचे दोन्ही हात गंभीररीत्या भाजले गेले आहेत. जर ही गळती वेळीच नियंत्रणात आली नसती किंवा मदतकार्यात थोडीही चूक झाली असती, तर एक्स्प्रेस वेवर मोठा अग्निकांड घडून अनेकांच्या जीवावर बेतले असते. सुरक्षिततेच्या कारणास्तव अपघातस्थळापासून एक किलोमीटरचा परिसर रिकामा करण्यात आला होता. प्रशासनाच्या या कठोर निर्णयामुळे प्रवाशांना त्रास झाला असला, तरी एका महाविनाशकारी दुर्घटनेचा धोका टळला आहे.



'पेरूच्या लाकडाने' वाचवले हजारो प्राण


तांत्रिक यंत्रणा हतबल झाल्या असताना, तज्ज्ञांनी पेरूच्या झाडाच्या लाकडापासून तयार केलेल्या खुट्टीचा (Wooden Plug) वापर करून ही गळती रोखली आणि एक मोठा अनर्थ टाळला. टँकरचा 'मेन व्हॉल्व' तुटल्यामुळे अत्यंत ज्वलनशील वायूचा विसर्ग वेगाने सुरू होता. उणे तापमानामुळे लोखंडी अवजारे वापरणे कठीण होते, अशा वेळी तज्ज्ञांनी पेरूच्या लाकडाची निवड केली. हे लाकूड मऊ आणि लवचिक असते, जे प्रोपोलिनसारख्या कमालीच्या थंड संपर्कात आल्यावर आकुंचन पावण्याऐवजी फुगते आणि छिद्रात घट्ट बसते. ज्याप्रमाणे वाईनच्या बाटलीला लाकडी बुच लावून हवा बंद केली जाते, अगदी त्याच धर्तीवर ही 'पेरूची खुट्टी' व्हॉल्वमध्ये बसवण्यात आली. तब्बल ३६ तासांच्या अथक परिश्रमानंतर आणि या विशेष ऑपरेशननंतर वायू गळती पूर्णपणे थांबवण्यात यश आले.



२२ टन गॅसचा स्फोट झाला असता तर घाट हादरला असता


ज्या टँकरचा अपघात झाला, त्यामध्ये तब्बल २२ टन प्रोपोलिन वायू साठवलेला होता. तज्ज्ञांच्या मते, जर या वायूचा स्फोट झाला असता, तर अपघातस्थळापासून तब्बल १० किलोमीटरपर्यंतचा परिसर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असता. यामुळे केवळ महामार्गच नव्हे, तर संपूर्ण घाट परिसर एका मोठ्या संकटात सापडला असता. प्रोपोलिन वायूचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो 'वासरहित' असतो, त्यामुळे त्याची गळती होत असल्याचे सहजासहजी लक्षात येत नाही. हा वायू मानवी शरीरात गेल्यास श्वासोच्छवासात अडथळा निर्माण करून जीवघेणा ठरू शकतो. तसेच, अत्यंत ज्वलनशील असल्याने कोणत्याही छोट्याशा ठिणगीमुळे याचा मोठा भडका उडू शकला असता.



गॅस ट्रान्सफर आणि पेट्रोल लाईनचा धोका


टँकरमधील २२ टन ज्वलनशील वायू आणि जमिनीखालून वाहणारे पेट्रोल यामुळे हा संपूर्ण परिसर एका 'लाईव्ह बॉम्ब'वर उभा होता. जीवावरचं संकट आणि तीन टप्प्यांतील थरार अपघाग्रस्त टँकर हलवणे हे एक मोठे आव्हान होते. त्यातील वायूचे वजन कमी केल्याशिवाय तो हलवणे अशक्य होते. त्यामुळे बचाव पथकाने अत्यंत जोखमीचे पाऊल उचलत तीन टप्प्यांत गॅस ट्रान्सफर करण्याचे काम हाती घेतले. वायू गळती आणि पेट्रोल लाईनचा वाढता धोका लक्षात घेता, तिथे काम करणारा प्रत्येक कर्मचारी आपला जीव मुठीत धरून कर्तव्यावर होता. एखादी छोटीशी चूक केवळ कर्मचाऱ्यांचाच नव्हे, तर १० किमी परिसराचा घास घेऊ शकली असती. आधुनिक यंत्रणा जिथे हतबल ठरल्या, तिथे पेरूच्या लाकडाच्या नैसर्गिक गुणधर्माचा वापर करून गळती रोखण्यात आली. या एका छोट्या खुट्टीमुळे हजारो प्रवाशांचे प्राण वाचले.

Comments
Add Comment

Nagpur BRICS Summit 2026 : नागपूरमध्ये ११ जुलैपासून ब्रिक्स परिवहन मंत्र्यांची तिसरी बैठक

- जागतिक परिवहन सहकार्य, शाश्वत विकास आणि नव्या तंत्रज्ञानावर होणार मंथन नागपूर : भारताच्या ब्रिक्स २०२६

Maharashtra Rain : नाशिक, पुणे, जळगाव, सांगलीला पावसाने झोडपले, अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली

मुंबई : गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नाशिकचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरात अनेक

Pune Building Collapsed : मुसळधार पावसात भीषण दुर्घटना! पिंपरी-चिंचवडमध्ये वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाची इमारत कोसळली; १४ जण अडकल्याची भीती

पुणे : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले असतानाच पुणे जिल्ह्यात मोठी

Andheri Tree Fall : मुंबईत आणखी एक दुर्घटना! अंधेरीत फांदी कोसळून पादचारी गंभीर जखमी

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान झाड कोसळण्याच्या घटनांमध्ये आणखी एक भर पडली आहे. अंधेरी पूर्व

Chandrashekhar Bawankule : राज्यातील २ लाख आदिवासींना मिळणार 'सातबारा'

- वनपट्टाधारकांसाठी 'नमुना ७ ई आणि १२ ई' लागू; महसूलमंत्र्यांची विधानसभेत ऐतिहासिक घोषणा मुंबई : राज्यातील लाखो

Vasai-Virar Rain Update : वसई-विरारमध्ये पावसाचा कहर! पूर, वीज आणि इंटरनेट बंद; हजारो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

पालघर : वसई-विरार (Vasai- Virar) परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सलग दोन