मुंबई : भारत–पाकिस्तान क्रिकेट सामना होणार की नाही, या मुद्द्यावर निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. टी-20 वर्ल्ड कप २०२६ अंतर्गत भारताविरुद्ध खेळण्यास नकार देणाऱ्या पाकिस्तानने अखेर माघार घेतली असून, ICCच्या मध्यस्थीनंतर १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे हा सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) भारताविरुद्ध सामना न खेळण्याची आक्रमक भूमिका घेतली होती. सुरक्षेच्या कारणास्तव बांग्लादेशने भारतात येण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्तानने बांग्लादेशच्या समर्थनार्थ भारताविरुद्ध सामना बहिष्कृत करण्याची धमकी दिली होती. यामुळे ICCसह आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळात अस्वस्थता निर्माण झाली होती.
भारत पाकिस्तान सामना म्हणजे क्रिकेटचाहत्यांसाठी चुरशीची अटीतटीचा सामना , त्यामुळे या सामन्याची तिकिटांची किंमतही लाखो -करोडोंच्या'घरात जाते. त्यामुळे भारत–पाकिस्तान सामना रद्द झाल्यास स्पर्धेच्या आर्थिक गणितावर मोठा परिणाम होणार असल्याची जाणीव ICCला झाल्यानंतर त्यांनी थेट संघर्षाऐवजी कूटनीतीचा मार्ग स्वीकारला. या प्रक्रियेत श्रीलंका, यूएई आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचा सहभाग निर्णायक ठरला.
कोलंबो येथे सामना आयोजित असल्याने श्रीलंका क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानवर दबाव वाढवला. श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांनीही थेट पाकिस्तान संघाशी संवाद साधत सामना होणे आवश्यक असल्याचे मत मांडले. याशिवाय, यूएई क्रिकेट बोर्डाने क्रिकेटच्या व्यावसायिक हितांचा मुद्दा पुढे करत पाकिस्तानला भूमिकेवर पुन्हा विचार करण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, ज्यांच्यासाठी पाकिस्तान उभा राहिला होता, त्या बांग्लादेश क्रिकेट बोर्डानेही भूमिका बदलत पाकिस्तानला सामना खेळण्याची विनंती केली. ICCकडून बांग्लादेशच्या हितांचे संरक्षण करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर पाकिस्तानाला माघार घ्यावीच लागली. या सर्व घडामोडीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अखेर नमती भूमिका घेत भारताविरुद्ध सामना खेळण्यास संमती दिली आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे.