मुंबई: सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर राज्यात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले परखड मत व्यक्त केले.
पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रभक्त आणि देशभक्त संस्था असून गेल्या शंभर वर्षांपासून देशात कार्यरत आहे. आपत्ती आली त्या ठिकाणी संघ नेहमीच पुढे असतो. संघाच्या कार्यकर्त्यांच्या कणाकणात राष्ट्रभक्ती भरलेली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, संबंधित कार्यक्रम मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. सलमान खान हा भारताचा नागरिक असून तो येथील परंपरा आणि संस्कृती मान्य करतो. त्यामुळे कार्यक्रम मुंबईत असताना त्याने उपस्थित राहण्यात गैर काय आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा चांगला हिंदू: नितेश राणे
या मुद्द्यावर कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनीदेखील आपले मत मांडले आहे. ते म्हणाले की; “सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा चांगला हिंदू आहे. उद्धव ठाकरे खरेच हिंदू आहेत का, हे तपासण्याची वेळ आली आहे. सलमान खानने किमान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची हिंमत दाखवली. पण, उद्धव ठाकरे कधी राहुल गांधींच्या समोर स्वतःच्या वडिलांना हिंदुहृदयसम्राट म्हणण्याची हिंमत दाखवतील का, हे उद्धव किंवा संजय राऊतांना विचारा”, असा हल्लाबोल राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी केला.
संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले नसल्याने पोटदुखी: मुख्यमंत्री
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या कार्यक्रमावर राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले. “ज्यांना निमंत्रण मिळाले नाही, त्यांना त्याचे वाईट वाटत आहे. त्यामुळे ज्यांना निमंत्रण मिळाले, त्यांच्यावर टीका केली जात आहे. संघाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर समाजातील विविध क्षेत्रांतील लोकांना संघाबाबत स्पष्ट माहिती मिळावी, वाद-अपवाद दूर व्हावेत, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.