नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने सध्या पाच राज्यांतील मतदारयाद्यांची सखोल तपासणीवर (एसआयआर) लक्ष केंद्रित केले नसून, महाराष्ट्र, झारखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरसह इतर १२ राज्यांमध्येही एसआयआर मोहीम राबवण्याची तयारी सुरू केली आहे. याचे काम मे २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
महाराष्ट्र, झारखंड, जम्मू काश्मिर या राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडून एक वर्षाहून अधिक काळ लोटला असला तरी, मतदारयांद्याबाबत सर्वसमान्य मतदारांनाही संभ्रम आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून एसआयआर मोहीम राबवताना, सध्या पश्चिम बंगाल, तामीळनाडू, केरळ या राज्यांतील राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत असला तरी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने काम सुरू ठेवले आहे. तसेच, निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०२६ च्या पहिल्या आठवड्यात या राज्यांच्या निवडणूक तारखांची अधिकृत घोषणा होऊ शकते.
निवडणूक आयोगाच्या हालचालींवरून असे संकेत मिळत आहेत की, १५ फेब्रुवारीनंतर आयोगाची पथके या राज्यांचा दौरा सुरू करतील. मतदार यादीच्या पुनरीक्षणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, विविध राज्यांच्या अंतिम मतदार याद्या खालीलप्रमाणे प्रसिद्ध केल्या जातील: आसाम: १० फेब्रुवारी, बंगाल, केरळ, पुडुचेरी: १४ फेब्रुवारी, तामिळनाडू: १७ फेब्रुवारी या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतरच प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली जाईल. विशेष म्हणजे, २०२१ मध्ये या राज्यांच्या निवडणुकांची घोषणा २६ फेब्रुवारीला करण्यात आली होती. या पाच राज्यांपैकी पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमध्ये सध्या विरोधी पक्षांची सरकारे आहेत, तर आसाम आणि पुडुचेरीमध्ये एनडीएची सत्ता आहे. त्यामुळे ही निवडणूक आगामी राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.