दुबई : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ (ICC T20 World Cup 2026) मधील सर्वात बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना अवघ्या सहा दिवसांवर असतानाच पाकिस्तानने क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. भारतासोबत खेळण्यास सुरुवातीला नकार देणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आता आयसीसीसमोर ४ अटींची नवी खेळी खेळली आहे. रविवारी आयसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डासोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. पाकिस्तानने या स्पर्धेतून माघार घेऊ नये, हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. मात्र, पाकिस्तानने आपली माघार मागे घेण्याऐवजी आयसीसीसमोर नव्या मागण्यांची यादीच सादर केली आहे. या मागण्यांवर आयसीसीने आता आपला अंतिम निर्णय दिला असून, भारत-पाक सामन्याच्या भवितव्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
मुंबई : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असले, तरी उपमुख्यमंत्री ...
आयसीसीचा पाकिस्तानला दणका; ४ पैकी ३ मागण्या फेटाळल्या
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आयसीसीसमोर मागण्यांची जंत्रीच सादर केली होती. यामध्ये त्यांची पहिली मागणी २०१२ पासून बंद असलेली भारत-पाक द्विपक्षीय मालिका तटस्थ ठिकाणी पुन्हा सुरू करण्याबाबत होती. मात्र, आयसीसीने हा विषय दोन देशांमधील बोर्डांचा असून तो आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर असल्याचे सांगत ही मागणी फेटाळून लावली. दुसरीकडे, आयसीसीच्या एकूण महसुलात आपला वाटा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या बरोबरीने मिळावा, अशी पाकिस्तानची दुसरी आर्थिक मागणी होती; परंतु आयसीसीने त्यात कोणताही बदल करण्यास नकार दिला. सर्वात चर्चेत राहिलेली तिसरी मागणी म्हणजे भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचे (Handshake) धोरण थांबवावे, ही होती. बीसीसीआयचा हा निर्णय त्यांचा अंतर्गत विषय असल्याचे स्पष्ट करत आयसीसीने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. पाकिस्तानला दिलासा देणारी एकमेव गोष्ट म्हणजे त्यांची चौथी मागणी. २०२६ च्या टी-२० वर्ल्ड कपमधून बांगलादेशला वगळून स्कॉटलँडला संधी दिल्यामुळे बांगलादेशला आर्थिक भरपाई मिळावी, ही मागणी मात्र आयसीसीने विचारात घेतली असून ती मान्य झाल्याचे समजते. अशा प्रकारे, चारपैकी तीन प्रमुख आघाड्यांवर पाकिस्तानला रिकाम्या हाताने परतावे लागले आहे.