अहिल्यानगर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पारनेर, अहिल्यानगर येथे 'तौरल इंडिया-सुपा प्लांटचे' उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असून तंत्रज्ञान व उत्पादन क्षेत्र या प्रगतीला गती देत आहे. तसेच भारताच्या औद्योगिक प्रगतीत महाराष्ट्र दमदार पाऊल टाकत आहे. तौरल इंडिया–सुपा प्लांट प्रकल्प हा महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मविश्वासाचा उत्सव आहे.
आपल्या सरकारने दावोसमधून उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये सुमारे ५० हजार कोटींची गुंतवणूक आणली आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात ११,५१९ कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्यातून सुमारे १८ हजार रोजगार निर्माण होतील, तर उत्तर महाराष्ट्रात जवळपास ७५ हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच, महाराष्ट्र शासन प्रत्येक उद्योजकाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा संदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, खासदार भागवत कराड, तौरल इंडियाचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गीते, ह.भ.प. नामदेवशास्त्री महाराज, ह.भ.प. शिवाजी महाराज व इतर मान्यवर उपस्थित होते.