मुंबई : मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी उबाठाच्यावतीने उमेदवार देण्यात येणार अशाप्रकारची वल्गना करत निवडणुकीला सामोरे जाण्याचे वातावरण निर्माण करणाऱ्या उबाठाने अखेर या निवडणुकीतून माघार घेत पळ काढली.संध्याकाळपर्यंत महापालिका सचिव कार्यालयात उबाठाच्यावतीने उमेदवारी अर्ज भरण्यास त्यांच्या पक्षाचे उमेदवार न आल्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक ही बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापौरपदी भाजपच्या रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी यांची निवड निश्चितच झाली आहे. मात्र, निवडणुकीचे वातावरण निर्माण करणाऱ्या उबाठाला केवळ मनसेची भीती असल्यामुळेच मराठी उमेदवाराचे कारण पुढे करत त्यांनी निवडणूक न लढवण्याचे कारण पुढे केले आहे. परंतु या निवडणुकीत मनसे तटस्थ राहिल किंवा ते भाजपला मतदान करतील याच भीतीपोटी उबाठाने या निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. त्यामुळे शनिवारी भाजपच्यावतीने महापौरपदासाठी रितू तावडे आणि उपमहापौरपदासाठी संजय घाडी यांनी आपले उमेदवारी अर्ज महापालिका सचिव मंजीरी देशपांडे यांना सादर केले. त्यानंतर उबाठाच्यावतीने कोण उमेदवारी अर्ज भरतात याकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु दुपारपर्यंत उबाठाकडून कोणत्याही प्रकारची हालचाल न झाल्यामुळे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पक्षाच्या महापालिका गटनेत्या किशोरी पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला त्यांनी मुंबईचा महापौर मराठी माणूस होत असेल तर आम्ही त्यात कोणताही अपशकून करणार नाही. मराठी माणूस जिंकला आहे,हे आमच्यासाठी महत्वाचे आहे,असे स्पष्ट करत मातोश्रीवर झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार या दोन्ही पदांसाठी उमेदवार देणार नसल्याचे कबूल होते. त्यानुसार सायंकाळी सहा वाजेपर्यंत विरोधी पक्षाच्यावतीने कुणीही उमेदवार अर्ज सादर केला नव्हता. महापालिका सचिव मंजिरी देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महापौर पदासाठी आणि उपमहापौरपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाला आहे. विरोधी पक्षाकडून एकही अर्ज आला नसल्याचे त्यांनी कबुल केले.त्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोधच होणार आहे.
मात्र, या निवडणुकीत उबाठाने उमेदवार न देण्यामागील प्रमुख कारण हे मनसेच असल्याचे बोलले जात आहे. महापालिकेत मनसेचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेने शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे.त्यामुळे या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत मनसेने महायुतीच्या बाजुने मतदान केल्यास किंवा तटस्थ राहिल्यास उबाठा पक्षाची नाचक्की होईल आणि उबाठा मनसेची युती तुटली अशाप्रकारचा प्रचार होईल याच भीतीने या निवडणुकीतून उबाठाने माघार घेतल्याचे बोलले जात आहे. त्यातच स्वीकृत नगरसेवकांपैंकी एक जागा मनसेला दिली जावी अशी मागणी मनसेकडून होत आहे. त्यामुळे निवडणुकीत उबाठाला मनसेने पाठिंबा दिल्यास ही जागा सोडण्यासाठी तडजोड करावी लागेल. यापेक्षा निवडणुकीसाठी तडजोड करावी लागू नये आणि त्यांना स्वीकृत नगरसेवक दिला जावू नये याचसाठी उमेदवार न देण्याचा निर्णय उबाठाने घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मनसेच्या सहा नगरसेवकांना किंमत न देण्यासाठीच उबाठाने हा डाव टाकला असल्याचेही बोलले जात आहे.