मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ताफ्यात असलेली कचऱ्याची वाहने आता जुनी असल्यामुळे अपघाताचा धोका निमा्रण होतो. ही बाब लक्षात घेता आता महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने जुनी आणि खराब झालेली वाहने रस्त्यावर उतरवू नये अशाप्रकारच्या सूचना महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिल्या आहेत.
कोणत्याही खराब झालेले किंवा वाहतुकीसाठी योग्य नसलेल्या वाहनांंचा वापर करण्यात येवू नये अशाप्रकारच्या सूचना उपायुक्त किरण दिघावकर यांनी सहायक अभियंत्यांना दिल्या आहेत. तसेच अशाप्रकारच्या कचरा वाहनांमुळे दुघर्टना किंवा अपघात झाल्यास त्याला संबंधित अधिकारी जबाबदार असेल असेही नमुद केले आहे.
धारावीतील घनकचरा संकलन आणि वाहतूक ऑपरेशन्सच्या अलीकडेच केलेल्या फील्ड तपासणीदरम्यान असे दिसून आले आहे की ,अनेक मोठ्या कॉम्पॅक्टर आणि मिनी-कॉम्पॅक्टर वाहनांची स्थिती अत्यंत वाईट आहे. अशा वाहनांना वारंवार बिघाड होण्याची शक्यता असते. आणि गंभीर सुरक्षेला धोका निर्माण होतो, ज्यात प्राणघातक अपघात होण्याचा धोका असतो. ही बाब लक्षात घेऊन आणि सार्वजनिक सुरक्षा, कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि अखंडित घनकचरा व्यवस्थापन कार्याच्या हिताच्या दृष्टीने, या सूचना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक वॉर्डातील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ताफ्यात असलेल्या कचरा वाहनांची सखोल तात्काळ तपासणी करण्यात यावी. सार्वजनिक रस्त्यावर चालण्यासाठी यांत्रिकरित्या योग्य आणि सुरक्षित असलेल्या वाहनांनाच चालवण्याची परवानगी दिली जाईल. तसेच सर्व खराब झालेले, असुरक्षित किंवा अयोग्य वाहने तात्काळ नाकारली जावी आणि सेवेतून काढून घेतली जावी अशाप्रकारे सूचना करत नाकारलेल्या वाहनांचा अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत.