मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पेच अजूनही कायम आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांचे नाव या पदासाठी आघाडीवर असल्याचे मानले जात होते, मात्र पटेल यांनी स्वतः आपण या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या भेटीत पक्षाच्या आगामी नेतृत्वाबाबत आणि सुनेत्रा पवार यांच्या नवीन जबाबदारीबाबत चर्चा झाल्याचे समजते. पटेल यांनी अध्यक्षपद नाकारल्यामुळे आता पक्ष कोणाच्या नेतृत्वाखाली पुढे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारामती : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघातावरून राज्यात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अजित पवार यांनी भाजपच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख ...
प्रफुल्ल पटेल यांची मोदी-शहांसोबत बैठक
प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना महाराष्ट्रातील सद्यस्थितीची सविस्तर माहिती दिली. विशेषतः सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी आणि त्यानंतरचे राजकीय वातावरण यावर या भेटीत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. प्रफुल्ल पटेल यांनी मोदी आणि शाह यांची स्वतंत्र भेट घेऊन साधारण ५ ते ६ मिनिटे संवाद साधला. या महत्त्वाच्या भेटीनंतर आता लवकरच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण आणि पक्षाचे आगामी राष्ट्रीय अध्यक्ष या विषयांवरही या बैठकीत गुप्त चर्चा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी आपण अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे आधीच स्पष्ट केल्यामुळे आता सर्व सूत्रे सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहतील, असे संकेत मिळत आहेत.
सुनेत्रा पवारांना दिल्लीचं निमंत्रण
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे बदलले असून, आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का? या चर्चेने जोर धरला आहे. याच संदर्भात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत केवळ राज्याच्या राजकीय परिस्थितीवरच नव्हे, तर सुनेत्रा पवार यांच्या नवीन जबाबदारीवरही सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीत विलीनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना अमित शहा यांनी "काही लोकांना यात केवळ राजकारण दिसत आहे," असे विधान केल्याचे समोर आले आहे. या विधानामुळे भाजपचा दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाला छुपा विरोध आहे की काय? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांची विचारपूस केली. अजित पवार यांचे सर्व अंत्यविधी आणि धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांना दिल्लीला घेऊन या, असे खास निमंत्रणच या दोन्ही बड्या नेत्यांनी पटेल यांना दिले आहे. या आगामी दिल्ली दौऱ्यात राष्ट्रवादीच्या भविष्यातील वाटचालीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी विलिनीकरणावर स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी या सर्व वावड्या असल्याचे सांगत विलीनीकरणाच्या शक्यता पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. "विलीनीकरणाबाबत अजितदादांची माझ्याशी कधीही चर्चा झाली नाही आणि अशा कोणत्याही हालचाली सुरू नाहीत," असे स्पष्टीकरण पटेल यांनी दिले आहे. अजित पवार यांच्या मनातील रणनीतीचा उलगडा करताना पटेल म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मते विभागली जाऊ नयेत, यासाठी अजितदादा आग्रही होते. "आपण सर्व वेगवेगळे लढलो तर मतांचे विभाजन होईल आणि त्याचा फटका बसेल. त्यामुळे शरद पवार गटाशी केवळ निवडणूक समन्वय साधण्याबाबत दादांनी भूमिका मांडली होती," अशी माहिती पटेल यांनी दिली. थोडक्यात सांगायचे तर, दोन्ही पक्षांचे विलीनीकरण नव्हे, तर केवळ निवडणुकांपुरता समन्वय साधण्याचा अजितदादांचा विचार होता, असे आता स्पष्ट झाले आहे.