पुणे : पुणेकरांचा प्रवास आता लवकरच आरामदायी होणार आहे. कारण पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन लवकरच सुरू होणार असून प्रवासाचा वेळ हा कमी होणार आहे. रेल्वे प्रमाणे आता मेट्रोही आपले जाळे देशभरात विणत चालली आहे. मेट्रो ही काळाची गरज आहे. त्यामुळे मेट्रोचा विस्तार हा झपाटयाने होत आहे.
पुणेकरांच्या वेळेची होणार बचत
हिंजवडी ते शिवाजी नगरपर्यंत प्रवास करायला सध्या २ तास लागतात. हाच वेळ सरळ अर्ध्या तासावर येणार आहे. त्यासोबतच काळ जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात पुण्यातील मेट्रो मार्गिकेचा विस्तार करण्यासाठी ५१७ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली गेली आहे.
मेट्रो ३ चे मार्चमध्ये होणार उदघाटन
पुणेकरांसाठी हि सेवा मार्च मध्ये सुरु होणार असून उन्हाच्या तडाख्यात पुणेकरांना गारेगार प्रवास करायला मिळणार आहे. हिंजवडी ते शिवाजी नगर या चाचणी फेऱ्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या असून पुणे मेट्रो ३ उदघाटनासाठी सज्ज झाली आहे.
मेट्रोमुळे पुणेकरांना मिळणार वाहतूक कोंडीतून सुटका
या मेट्रोचे कनेक्शन थेट पुण्याच्या आयटी सेक्टरशी जोडले जाणार आहे. या मार्गावर आयटी कर्मचाऱ्यामुळे होणारी वाहतूक कोंडी ही लवकरच संपणार आहे. त्यामुळे तब्बल २ लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
विद्यापीठ चौकात या मेट्रोवरती डबल डेकर वाहतूक मार्ग उभारणार आहेत. यामुळे सर्वाधिक वाहतूक कोंडी असल्या भागातील कोंडी फोडण्यात यश मिळणार आहे. यामध्ये सर्वात खालच्या स्थरावर स्थानिक वाहनांची वाहतूक त्यावरील उड्डाणपुलावर आणखी एक वाहतूक मार्ग आणि त्यावरती मेट्रो मार्गिका असणार आहे.
कोणत्या स्थानकांचा होणार समावेश
काल सादर केलेल्या अर्थसंकल्पात महा मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा विस्तार करण्याबाबत माहिती देण्यात आली. सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये दोन मार्गिका सुरु असून, तिसरी प्रवाशांसाठी लवकरच सुरु होईल. तसेच, २०२७ पर्यंत पिंपरी- निगडी अशी ४.५ किमी लांब मेट्रोचं काम पूर्ण होण्याची शक्यात आहे. या मार्गिकेच ५० टक्के काम सध्या पूर्ण झाले आहे. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात विस्तारामध्ये खडकवासला- स्वारगेट- खराडी , रामवाडी- वाघोली-विठ्ठलवाडी, वनाज - चांदणी चौक आणि नल स्टॉप- वारजे या प्रमुख मार्गांचा समावेश आहे.






