सुनील तटकरे यांचे शरद पवार गटाला प्रत्युत्तर; विलीनीकरणाविषयी केले सविस्तर भाष्य
मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत दोन्ही गटातील नेतेमंडळींमध्ये दावे-प्रतिदावे सुरू आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावर भाष्य केले असून, "ज्यांना सोबत यायचे आहे, त्यांनी 'एनडीए'बाबत भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे", असे ते म्हणाले.
माध्यमांशी संवाद साधताना तटकरे म्हणाले की, आम्ही भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) आहोत आणि सत्तेत सहभागी आहोत. महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी आणि देशाला गतिमान करण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला होता. ही भूमिका सामूहिक आहे आणि ती पुढे नेणे हे आमचे कर्तव्य आहे. ज्यांना आमच्यासोबत यायचे आहे, त्यांनी एनडीएमध्ये येण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची ही भूमिका पूर्वीपासून ठरलेली असून, त्याच भूमिकेवर निवडणुकीला सामोरे जाऊन यशही मिळाले", असे तटकरे यांनी सांगितले.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यासाठी सुनेत्रा पवार पुढाकार घेणार का, या प्रश्नावर उत्तर देताना तटकरे म्हणाले की, अजित पवार हयात असतानाच आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो होतो आणि भाजपासोबत सत्तेत आहोत. या निर्णयाशी जे सहमत आहेत, त्यांनी तो स्वीकारावा. त्यावरून कोणालाही वेगळ्या अपेक्षा ठेवण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. वडेट्टीवार यांना सुनावले
दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नयेत यासाठी कट रचला जात असल्याचा आरोप केला होता. त्यावर पलटवार करताना तटकरे म्हणाले की, विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर कोणाचा होणार, याकडे लक्ष द्यावे. काँग्रेसमध्ये अंतर्गत पळवापळवी सुरू असताना आमच्यावर टीका करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. आधी आपल्या पक्षातील परिस्थिती सांभाळावी, नंतर आमच्याकडे पाहावे, असा टोला त्यांनी लगावला. विलीनीकरण कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षात होणार?
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत शरद पवार यांनी केलेल्या भाष्यावर प्रतिक्रिया देण्यास तटकरे यांनी टाळाटाळ केली. श्रद्धेय शरद पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर मी काही बोलणार नाही, असे स्पष्ट करत, इतर काही प्रतिक्रिया अंत्यसंस्कार सुरू होण्यापूर्वीच आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. विलीनीकरण कुठल्या पक्षाचे कुठल्या पक्षात होणार, हे स्पष्ट झाले तरच त्यावर बोलता येईल, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निर्धारपूर्वक एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून, राज्यातील १३ कोटी जनतेने विधानसभेच्या निवडणुकीत त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे एनडीएमधील आमची भूमिका स्पष्ट आणि ठाम आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने टीका-टिप्पणी करत असतो, पण आमचा निर्णय बदलणार नाही, असे सुनील तटकरे यांनी नमूद केले.






