टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणाऱ्या गट फेरीच्या सामन्यात पाकिस्तानचा भारताशी सामना होणार होता. मात्र आयसीसीने म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर काढल्यानंतर पाकिस्तान सरकारने हा निर्णय घेतला आहे.
आयसीसीचा पाकिस्तानला थेट इशारा:
पीसीबीने स्पष्ट केलं की, पाकिस्तान संघ टी-२० वर्ल्ड कपमध्ये सहभागी होईल, मात्र १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध होणारा सामना खेळणार नाही. या निर्णयामुळे संपूर्ण स्पर्धेच्या नियोजनावर पाणी फेरलं असून, आयसीसीने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आयसीसीने पीसीबीला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,असा थेट इशाराही दिला आहे.
आयसीसीची भूमिका:
आयसीसीने रविवारी उशिरा जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, जरी राष्ट्रीय धोरणांमध्ये सरकारची भूमिका असते हे मान्य असलं, तरी अशा निर्णयांमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मोठा फटका बसू शकतो. पीसीबीने आपल्या निर्णयाचे देशांतर्गत क्रिकेटवर होणारे दीर्घकालीन आणि गंभीर परिणाम लक्षात घ्यायला हवेत.या निर्णयामुळे जागतिक क्रिकेट इकोसिस्टमवर परिणाम होऊ शकतो, ज्याचा पीसीबी स्वतः एक सदस्य आणि लाभार्थी देखील आहे. आयसीसीने पीसीबीकडे पुन्हा एकदा निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. सर्व पक्षांना मान्य होईल असा तोडगा काढण्यासाठी परिषद तयार असल्याचंही आयसीसीने स्पष्ट केलं आहे.
पीसीबीविरुद्ध पुढीलपैकी एक किंवा अधिक धक्कादायक अॅक्शन घेतल्या जाऊ शकतात
- पाकिस्तानला संपूर्ण टी-२० वर्ल्ड कपमधूनच बाहेर काढले जाऊ शकते. - आयसीसीकडून पाकिस्तानला मिळणारा वार्षिक महसूल (सुमारे ३५० कोटी रुपये) रोखला जाऊ शकतो. - भारत-पाक सामना रद्द झाल्यामुळे ब्रॉडकास्टर जिओ-हॉटस्टारला होणाऱ्या नुकसानीची (सुमारे २०० कोटी रुपये) भरपाई PCB कडून वसूल केली जाऊ शकते. - पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये विदेशी खेळाडूंना सहभागी होण्यास बंदी घातली जाऊ शकते.
सुमारे २०० कोटींचे नुकसान:
जर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना झाला नाही तर जाहिरात, तिकीट विक्री आणि प्रसारण हक्कांमधून मिळणारे सुमारे २०० कोटी रुपयांचे नुकसान होईल. हे दोन्ही देशांसाठी एक मोठे आर्थिक नुकसान आहे. भारत हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे, मात्र पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नाही. हे पैसे त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. पाकिस्तानला दरवर्षी अंदाजे २८५ कोटी रुपये ($३४.५१ दशलक्ष) मिळतात. परंतु हे पैसे फक्त तेव्हाच मिळू शकतात जेव्हा पाकिस्तान बोर्डाकडून सर्व नियमांचे पालन केले जाते. त्यामुळे भारतासोबतचा सामना न खेळण्याचा निर्णय पाकिस्तानला महागात पडणार आहे.






