नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामण अगदी काही वेळातच संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरूवात झाली असून या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाकडून बजेटला मंजुरी मिळाली आहे. थोड्यावेळातच अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या त्या टॅब मध्ये नक्की काय दडलं आहे हे समजेल.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सलग नव्यांदा देशाचा बजेट सादर करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी अर्थमंत्री सितारमण यांना आपल्या हाताने दही - साखर भरवून शुभेच्छा दिल्या आहेत. कुढल्याही चांगल्या कामाची सुरुवात आपण दही साखर खाऊन करतो. म्हणूनच दही - साखर भरवून राष्ट्रपती यांनी निर्मला सीतारमण यांना शुभेच्छा दिल्या.
सोने आणि चांदीच्या किमतीत प्रचंड घसरण :
अर्थसंकल्पाच्या काही तास आधीच सराफा बाजारातून एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. जागतिक बाजारात अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतीत प्रचंड घसरण झाली असून गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शनिवारी चांदीच्या दरात तब्बल १९ टक्क्यांची विक्रमी घट झाली, ज्यामुळे चांदीचे दर ३ लाख १२ हजार रुपये प्रति किलोवर आले आहेत. सोन्याच्या दरातही सुमारे २ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली असून, १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख ६५ हजार रुपयांपर्यंत खाली आला आहे. जागतिक स्तरावर मौल्यवान धातूंच्या मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे ही स्थिती ओढवली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतींमुळे हैराण झालेल्या ग्राहकांना या घसरणीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
सराफा बाजारामध्ये चांदीच्या किमतींनी आजवरची सर्वात मोठी घसरण अनुभवली आहे. गेल्या आठवड्यात उच्चांकी पातळीवर असलेल्या चांदीच्या दरात शनिवारी १९ टक्क्यांची मोठी घट झाली. अवघ्या दोन दिवसांत चांदीचे भाव कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले असून, बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. मागील गुरुवारी चांदीचे दर ४ लाख ४० हजार ५०० रुपये प्रति किलो या ऐतिहासिक पातळीवर होते. मात्र, त्यानंतर सलग दोन दिवस दरवाढ रोखली जाऊन किमतीत मोठी घट झाली. एकाच दिवसात चांदी ७२ हजार ५०० रुपयांनी स्वस्त झाल्याने आता प्रति किलोचा दर ३ लाख १२ हजार रुपयांवर येऊन पोहोचला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला झालेली सर्व दरवाढ शेवटच्या दोन दिवसांत पुसली गेल्याने गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.