पाणी वहन करण्यासाठी संकुलात ९७० लिटर क्षमतेचा जलबोगद्याची उभारणी
मलजल प्रक्रिया केंद्रातील पाणी वहन करणाऱ्या भांडुप संकुलातील बोगदा प्रकल्पाला गती
मुंबई : घाटकोपर मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र ते भांडुप मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र आणि पुढे भांडुप संकुलापर्यंत तृतीय संस्करण प्रक्रिया केलेले पाणी वहन करण्यासाठी जलबोगद्याचा आराखडा व बांधकामाची कामे सध्या सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी भांडुप संकुल येथील प्रकल्प कार्यस्थळास भेट देऊन पाहणी केली. मलजल प्रक्रिया प्रकल्पाद्वारे ५० टक्के मलजलावर तृतीय संस्करण प्रक्रिया करण्याचे प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने ५०० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या तृतीय संस्करण प्रक्रिया केलेले पाणी वहन करण्यासाठी धारावी ते घाटकोपर आणि पुढे भांडुप संकुल पर्यंत ९७० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या जमिनीखालील बोगद्याची उभारणी प्रस्तावित आहे. या जलबोगद्याच्या बांधकामासंबंधी प्राथमिक कामे प्रगतिपथावर आहेत.
भांडुप संकुल ते भांडुप मलजल प्रक्रिया सुविधा केंद्रादरम्यानचे अंतर ४ हजार ३६५ मीटर आहे. भांडुप संकुल येथे १७५ मीटर खोलीचा लॉन्चिंग शाफ्ट उभारण्यात येत आहे. पैकी शाफ्टचे उत्खनन कार्य ४५ मीटर खोलीपर्यंत पूर्ण झाले आहे. बोगदा खनन कार्य पूर्ण झाल्यानंतर बोगदा खनन यंत्र बाहेर काढण्यासाठी भांडुप मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र येथे १०४ मीटर खोलीचा पुनर्प्राप्ती शाफ्ट प्रस्तावित आहे.
दुसऱ्या बोगदा खनन संयंत्राच्या सहाय्याने भांडुप मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र ते घाटकोपर मलजल प्रक्रिया सुविधा केंद्रादरम्यान प्रस्तावित बोगद्याच्या खोदणीसाठी आवश्यक संरेखन निश्चित करण्यात आले आहे. हे अंतर ७ हजार २४५ मीटर आहे. भांडुप मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र येथे १५५ मीटर खोलीचा लॉन्चिंग शाफ्ट उभारण्यात येत आहे. पैकी शाफ्टचे उत्खनन कार्य ७.७ मीटर खोलीपर्यंत पूर्ण झाले आहे.प्रकल्प अंतर्गत बोगदा खनन संयंत्राच्या सहाय्याने बोगदा खोदणीचे काम करण्यात येणार असून बोगद्याची लांबी एकूण मिळून ११ हजार ६१० मीटर इतकी आहे. भांडुप संकुल, भांडुप मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र व घाटकोपर मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र यादरम्यान आवश्यक संरेखन निश्चित करून बोगदा खोदणीचे कार्य नियोजित पद्धतीने प्रगतिपथावर आहे. आयुक्तांसमवेत या पाहणीमध्ये उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) पुरूषोत्तम माळवदे, प्रमुख अभियंता (पाणीपुरवठा प्रकल्प) महेंद्र उबाळे यांच्यासह संबंधित अभियंते, अधिकारी यावेळी उपस्थित होते.
धारावी ते घाटकोपरमधील प्रक्रिया केलेले मलजल भांडुप संकुलात
मुंबईच्या पाणी पुरवठ्यात वाढ करण्यासाठी आणि मागणी - पुरवठ्यातील तूट कमी करण्यासाठी विश्वासार्ह आणि हवामान बदल संवेदनक्षम स्त्रोत विकसित करण्याची गरज आहे. त्याचाच एक भाग म्हणून महानगरपालिका कार्यक्षेत्रात निर्माण होणा-या मलजलावर आधुनिक प्रक्रिया करण्यासाठी विविध ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्राची उभारणी करण्याचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मलजल प्रक्रिया प्रकल्पांद्वारे सांडपाण्यातील घनकचरा, घातक रासायनिक घटक तसेच रोगकारक जंतू काढून टाकण्यात येतात. परिणामी, प्रक्रिया केलेले पाणी सुरक्षितरीत्या पुनर्वापरासाठी उपलब्ध होते. त्यामुळे पाण्याच्या स्त्रोतांवरील ताण कमी होऊन नागरी स्वच्छता राखली जाते आणि नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होईल.
डॉ भूषण गगराणी, आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका