पनवेल (वार्ताहर): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची अधिकृत माहिती संसदेत देण्यात आली. त्यामुळे पनवेल, उरण, नवी मुंबई आणि रायगडमधील तमाम भूमिपुत्रांच्या अस्मितेचा विजय झाला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण 'लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्याबाबतचा अधिकृत प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडून प्राप्त झाला असल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने लोकसभेत स्पष्ट केले असून प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी अनेकदा तीव्र आंदोलन आणि पाठपुरावा केल्यानंतर ही एक महत्त्वाची घडामोड झाली.
संसदेत प्रस्तावाचा स्वीकार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाने एकमताने मंजूर केलेला ठराव केंद्र सरकारला (नागरी विमान वाहतूक मंत्रालय) अधिकृतपणे प्राप्त झाला असल्याची पुष्टी करण्यात आली. केंद्र सरकारने स्पष्ट केले की, राज्याने पाठवलेल्या 'लोकनेते दि. बा. पाटील' या नावाच्या प्रस्तावावर केंद्र सरकार सकारात्मक असून, त्यावर प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. विमानतळाचे अधिकृत नामकरण ही एक निश्चित प्रशासकीय प्रक्रिया आहे. राज्य सरकारच्या प्रस्तावानंतर केंद्र सरकार आता यावर अंतिम तांत्रिक मोहोर उमटवण्याच्या तयारीत आहे.नवी मुंबईच्या शेतकऱ्यांना, त्यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी दि. बा. पाटील यांनी मोठा लढा दिला होता. या जमिनी महाराष्ट्राच्या सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून नियोजित नव्या शहराच्या उभारणीसाठी संपादित करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने २०२२ मध्ये शिंदे-फडणवीस यांच्या भाजप शिवसेना सरकारने या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव या विमानतळाला मिळावे, हा केवळ आमचा आग्रह नसून तो प्रत्येक भूमिपुत्राचा हक्क आहे. केंद्र सरकारने संसदेत दिलेली ही माहिती आपल्या लढ्याला मिळालेली महत्वाची पावती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थानिक जनतेच्या भावनांची कदर करत असून, लवकरच यावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला.