मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी ही निवडणूक आता फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे जाहीर करण्यात आलेला राष्ट्रीय दुखवटा, भाजप आणि शिवसेनेची लांबणीवर पडलेली नोंदणी आणि आंगणेवाडीची जत्रा यासर्वांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक लांबणीवर पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईचा महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक येत्या ३१ जानेवारी रोजी घेण्याचे प्रशासनाच्यावतीने निश्चित करण्यात आले होते. परंतु, शिवसेना तसेच भाजपच्या नगरसेवकांची नोंदणी कोकण भवनमध्ये न झाल्याने हा निश्चित केलेला कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल असा अंदाज होता. त्यामुळे गुरुवारी आणि शुक्रवारी या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांची कोकण भवनमध्ये नोंदणी होवून पुढील प्रक्रियार राबवली जाणार होती.
परंतु बुधवारी सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे बुधवारी शासकीय कर्मचाऱ्यांचा सुट्टी जाहीर करून तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसांमध्ये नगरसेवकांची नोंदणी करण्यास अडचण नसली तरी दुखवटा असल्याने या कालावधी ही नोंदणी होणार नाही. त्यामुळे ही नोंदणी शनिवारी दुखवटा संपल्यानंतर होऊ शकते. त्यामुळे या महापालिकेच्या विशेष सभागृहासाठी सात दिवसांचा अवधी आवश्यक असल्याने येत्या ९ जानेवारी रोजी होणाऱ्या आंगणेवाडीतील जत्रेच्यानंतरच ही निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंगणेवाडीच्या जत्रेसाठी सर्वच पक्षांचे नगरसेवक जात असल्याने आणि त्यातच प्रथमच निवडून आल्याने त्यांना या जत्रेला जाणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक एक तर ९ फेब्रुवारीपूर्वी कमी कालावधीमध्ये विशेष सभागृह बोलावून करावी लागणार किंवा आंगणेवाडीची जत्रा पार पडल्यानंतर ही निवडणूक घ्यावी लागणार आहे.
विशेष म्हणजे सर्वच पक्षांनी आपल्या सर्व नगरसेवकांना कल्पना दिल्याशिवाय मुंबई न सोडण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे जर निवडणूक लांबणीवर पडल्यास आंगणेवाडीच्या जत्रेसाठी नगरसेवकांना जाता येणार नाही. अशा परिस्थितीतीत ही निवडणूक कमी कालावधीमध्ये आंगणेवाडीच्या जत्रेपूर्वी केली जाते की मग आंगणेवाडी जत्रेनंतरच केली जाते याकडे सर्वांचे लक्ष आहेत. त्यातच उबाठा शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापालिका प्रशासक तथा आयुक्तांची भेट घेऊन ही निवडणूक येत्या ९ फेब्रुवारी पूर्वी म्हणजे आंगणेवाडी जत्रेच्या पूर्वी घ्यावी अशाप्रकारची सूचना केली आहे. या मागणीचा विचार केल्यास फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होईल, अन्यथा ही निवडणूक फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलली जावू शकते, असे बोलले जात आहे.