नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी केंद्र सरकारने २०२६ च्या ४५ पद्म पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा केली आहे. देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक अशी या पुरस्कारांची ओळख आहे. यामुळे हा पुरस्कार मिळणे ही गौरवाची बाब आहे. यंदा महाराष्ट्रातील चार जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकनाट्य क्षेत्रातले तमाशा कलाकार रघुवीर खेडकर आणि कृषी क्षेत्रात कार्यरत असलेले श्रीरंग लाड तसेच पालघरमधील वारली संगीतकार भिकल्या लाडक्या ढिंका यांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. आशियातील पहिली रक्तपेढी स्थापन करणाऱ्या मुंबईच्या आर्मिडा फर्नांडिस यांनाही पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्मश्री पुरस्कार विजेते २०२६
- आर्मिडा फर्नांडिस (मुंबई) - आशियातील पहिली रक्तपेढी स्थापन करण्यात मोलाचे योगदान
- अंके गौडा- भारतातील सर्वात मोठ्या ग्रंथालयाची उभारणी
- भगवानदास रायकवार- बुंदेली वॉर आर्टचे प्रशिक्षक म्हणून पारंपरिक युद्धकलेचे जतन व प्रसार
- बृजलाल भट्ट (जम्मू-काश्मीर)- समाजसेवा व योगशिक्षणाच्या क्षेत्रातील योगदानासाठी
- बुदरी ठाडी (छत्तीसगड)-नक्षलग्रस्त भागात शिक्षण पोहोचवण्याच्या कार्यासाठी.
- चरण हेम्ब्राम (ओडिशा)- संथाली भाषेतील साहित्यनिर्मितीसाठी प्रसिद्ध लेखक.
- चिरंजी लाल यादव (उत्तर प्रदेश)- पितळकलेत (ब्रास आर्ट) लोकांना प्रशिक्षण देऊन पारंपरिक हस्तकलेचा विकास
- धार्मिक लाल चुन्नीलाल पांड्या- शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील योगदानासाठी
- डॉ. कुमारस्वामी थंगराज-जेनेटिक्स (आनुवंशिक संशोधन) क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी
- डॉ. पद्मा गुरमीत (लडाख)- सोवा-रिग्पा या पारंपरिक वैद्यक पद्धतीच्या संवर्धनासाठी
कोण आहेत तमाशा कलाकार रघुवीर खेडकर ?
- चार दशकांहून अधिक काळापासून रघुवीर खेडकर हे तमाशा रंगभूमीवर कार्यरत
- तमाशा फडातील 'सोंगाड्या'ची भूमिका करणारे कलावंत आणि तमाशा फडचालक
- 'अखिल भारतीय तमाशा परिषद' या संघटनेचे अध्यक्ष
- तरुणपणी तमाशात कथ्थक आणि लोककलेचे मिश्रण असलेले थाळीनृत्य करण्यासाठी लोकप्रिय