मुंबई : मुख्य मंत्रालय सरकारी कामासाठी अपुरे पडत आहे. याशिवाय जागा कमी असलयाने मंत्रयांची गैरसोयही होत आहे. जुन्या इमारतीतून दक्षिण मुंबईचा प्रशस्त नजाराही पाहता येत नसल्याने, नवी इमारत बांधणायचे काम सरकारने हाती घेतले आहे. या कामाला आता वेग आला असून मुख्य पाच माजली इमारत ही बांधली जाणार आहे.
राज्य सरकारने मंत्रालयाच्या मुख्य इमारतीला लागून नवीन इमारत उभारण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला त्यांनी सात मजली इमारत बांधण्याचे नियोजन केले होते परंतु,हेरिटेज समितीचा आक्षेप आणि सर्वोच्च न्यायालयाने मंत्रालय परिसरातील इमारतींना घालून दिलेली २४ मीटर उंचीची मर्यादा यामुळे नवी इमारत पाच मजली बांधण्याचा निर्णय झाला.
मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांची दलाने आहेत. याशिवाय सचिवांचीही कार्यालये आहेत. येथून समुद्रकिनारा दिसतो. नव्या इमारतीचा पाचवा मजला बांधला की, समुद्रकिनाऱ्याचा ‘नजारा’ मंत्रालयातून दिसणार नाही. त्यामुळे नवी इमारत पाचऐवजी चारच मजल्यांची बांधावी, असे सरकारच्या विचाराधीन आहे. त्या दृष्टीने गंभीर चर्चाही सुरू आहे. मात्र, यावर अंतिम निर्णय झाला नसल्याने तूर्त चार मजल्यांपर्यंत बांधकाम करण्याचे नियोजन केले जात असल्याचेही समजते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाला मंत्र्यांसाठी सुसज्ज इमारत बांधण्याचे लक्ष्य दिले. त्यानुसार मंत्रालयाची नवी इमारत १०० दिवसांत बांधून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. त्यासाठी इमारत बांधकामाचा कार्यादेश १ एप्रिल २०२५ रोजी जारी करण्यात आला. मात्र, प्रत्यक्ष सुरू करताना अनेक अडचणी आल्याने बांधकाम विभागाला १०० दिवसांत इमारत बांधून पूर्ण करणे शक्य झाले नाही. आता येत्या ३० एप्रिलपर्यंत बांधकाम पूर्ण करून महाराष्ट्र दिनी इमारतीचे लोकार्पण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.