युएईच्या अध्यक्षांच्या तीन तासांच्या भारत दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली : यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या दिल्ली दौऱ्याने भारत-यूएई संबंधांना नवे धोरणात्मक वळण मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सुमारे तीन तास चाललेल्या चर्चांनंतर संरक्षण, ऊर्जा, अवकाश, तंत्रज्ञान आणि अन्न सुरक्षेसह विविध क्षेत्रांमध्ये एकूण नऊ करारांवर सहमती झाली. या भेटीत सात महत्त्वाच्या घोषणांमुळे दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक मजबूत होणार असल्याचं स्पष्ट झालं.


प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चांमध्ये संरक्षण भागीदारीला विशेष महत्त्व देण्यात आलं. यासोबतच अवकाश क्षेत्रात संयुक्त पायाभूत सुविधा, प्रक्षेपण केंद्र आणि उपग्रह निर्मिती संदर्भातील सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने यूएईकडून भारताला दरवर्षी सुमारे ०.५ दशलक्ष मेट्रिक टन एलएनजी पुरवठा केला जाणार आहे. यामुळे यूएई भारतासाठी प्रमुख ऊर्जा भागीदारांपैकी एक ठरणार आहे. याशिवाय गुजरातमधील धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्रात यूएईकडून गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.


दोन्ही देशांनी सीमापार दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतली असून, अशा कारवायांना जबाबदार असणाऱ्यांवर आंतरराष्ट्रीय पातळीवर कारवाई व्हावी, यावर एकमत झालं. नागरी अणुऊर्जा, डेटा सेंटर, सुपरकॉम्प्युटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्येही सहकार्य वाढवण्याचा निर्णय चर्चेतून झाला.


अन्न सुरक्षेच्या करारामुळे भारतीय कृषी क्षेत्राला फायदा होणार असून, यूएईसाठी दीर्घकालीन अन्न पुरवठ्याचा मार्ग मजबूत होईल. तसेच डिजिटल क्षेत्रात ‘डेटा दूतावास’ संकल्पनेवर दोन्ही देश विचार करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.


सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी अबू धाबीमध्ये ‘हाऊस ऑफ इंडिया’ उभारण्यात येणार आहे. यामुळे युएईतील सुमारे ४५ लाख भारतीयांना सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र उपलब्ध होणार आहे. पश्चिम आशिया आणि आफ्रिका क्षेत्रातील शांतता, स्थैर्य आणि आर्थिक सहकार्य वाढवण्यावरही दोन्ही नेत्यांनी भर दिला.


या दौऱ्यामुळे भारत-यूएई भागीदारी केवळ आर्थिक मर्यादेत न राहता संरक्षण, तंत्रज्ञान आणि जागतिक धोरणात्मक सहकार्याच्या दिशेने अधिक व्यापक होत असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.

Comments
Add Comment

Pharmacy Sector: 'औषधनिर्माता भरती, पदोन्नती आणि सेवा नियम २०२५' लागू

नवी दिल्ली :  देशातील लाखो औषधनिर्मात्यांसाठी (Pharmacists) एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे.

Kolkata building collapse : भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली

ताराताला परिसरात मोठी दुर्घटना, अनेक जण जखमी कोलकाता : पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी कोलकाता (Kolkatta) येथे बुधवारी

LOC News : भारताकडून सिंधू नदीचे पाणी रोखल्यानंतर LoC वर पाकिस्तानची मोठी सैन्यबांधणी! ३५ अँटी-ड्रोन युनिट तैनात

- AI फेन्सिंगसह युद्धसज्जतेला वेग नवी दिल्ली : भारताने सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानकडे जाण्यापासून रोखल्यानंतर आणि

Jharkhand T20 League : झारखंड टी-२० लीग फायनलला गालबोट! स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी; ३५ जण जखमी

रांची : झारखंडची राजधानी रांची येथे झारखंड टी-२० लीगच्या (Jharkhand T20 League) अंतिम सामन्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली.

Fire Accident :लखनऊ कोचिंग क्लास आगप्रकरणी चौघांना अटक, चार अधिकारी निलंबित

लखनऊ(Lucknow) : अलीगंज (सेक्टर-डी) येथे एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश

Amit Shah : नाफेडच्या लिलाव पोर्टलचा शुभारंभ

नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ