मुंबई: रात्रीच्या प्रवासासाठी खास तयार करण्यात आलेली वंदे भारत स्लीपर ट्रेन आता सेवेत दाखल झाली असून प्रवाशांमध्ये या गाडीबाबत उत्सुकता वाढली आहे. आधुनिक सुविधा, वेगवान प्रवास आणि आरामदायी डबे ही या ट्रेनची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. मात्र प्रवासाचे नियोजन करताना तिकीट रद्द करायचे झाल्यास नेमका किती आर्थिक फटका बसणार, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. त्यामुळेच रेल्वे प्रशासनाने तिकीट रद्दीकरण आणि परताव्याचे नियम स्पष्ट केले आहेत.
रेल्वेच्या नियमांनुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेनचे कन्फर्म तिकीट रद्द केल्यास परतावा प्रवासाच्या वेळेवर अवलंबून असणार आहे. जर प्रवाशाने ट्रेन सुटण्याच्या किमान ७२ तास आधी तिकीट रद्द केले, तर तिकीट रकमेपैकी २५ टक्के शुल्क वजा करून उर्वरित रक्कम परत दिली जाईल.
प्रवासाच्या वेळेच्या अधिक जवळ तिकीट रद्द केल्यास कपात वाढते. ट्रेन सुटण्याच्या ८ तास ते ७२ तासांच्या कालावधीत तिकीट रद्द केल्यास तिकीट रकमेपैकी ५० टक्के रक्कम कापली जाईल आणि उरलेली रक्कम प्रवाशाला परत मिळेल.
मात्र ट्रेन सुटण्याच्या ८ तासांपूर्वी तिकीट रद्द न केल्यास किंवा त्यानंतर रद्द केल्यास कोणताही परतावा दिला जाणार नाही, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवास रद्द करण्याचा निर्णय वेळेत घेणे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हावडा–कामाख्या मार्गावर देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा कंदील दाखवला असून ही सेवा प्रिमियम रात्रीच्या प्रवासासाठी महत्त्वाची मानली जात आहे. आधुनिक रेल्वेचा अनुभव घ्यायचा असल्यास तिकीट बुकिंगसोबतच रद्दीकरणाचे नियम लक्षात ठेवणे प्रवाशांच्या फायद्याचे ठरेल.