मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत २४ जागा राखून सर्वांनाच धक्का देणाऱ्या काँग्रेसमध्ये नवे नाराजीनाट्य सुरू झाले आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी विद्यमान अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड यांच्या विरोधात शड्डू ठोकला असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
वास्तविक महायुती आणि ठाकरेंमधील सत्तासंघर्षात काँग्रेसचा निभाव लागेल की नाही, याबाबत काँग्रेस नेत्यांच्या मनातच साशंकता होती. परंतु, काँग्रेसने २४ जागांपर्यंत मजल मारली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे वर्षा गायकवाड स्वतःची पाठ थोपटून घेत असताना, भाई जगताप यांनी गायकवाड यांच्यामुळे पक्ष चांगली कामगिरी करू शकला नसल्याचा आरोप केला आहे. “मुंबईत अपेक्षित न मिळण्यास नेतृत्वच जबाबदार आहे. प्रभावी रणनीतीचा अभाव आणि कमकुवत संघटनेमुळे मुंबईत पक्षाची ताकद कमी झाली. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी पक्षाला जागा कमी मिळाल्या आहेत. या निकालांचे विश्लेषण केल्यास नेतृत्वातील त्रुटी स्पष्टपणे दिसतात. त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पद सोडावे”, असे जगताप यांनी म्हटले आहे.
जगताप-गायकवाड यांच्यातील संघर्ष
या वादाला केवळ पालिका निवडणुकीतील पराभव नव्हे, तर पक्षांतर्गत संघर्षही कारणीभूत आहे. वर्षा गायकवाड यांच्या गळ्यात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ पडल्यापासून पक्षावर एकहाती वर्चस्व मिळवण्याच्या नादात त्यांनी अनेकांना दुखावले. प्रिया दत्त, संयज निरुपम, भाई जगताप, मिलिंद देवरा, अशी अनेक नावे सांगता येतील. भाई जगताप यांची खुर्ची काढून हायकमांडने गायकवाड यांना अध्यक्षपदावर बसवले. तेव्हापासून या दोघांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला, तो आजतागायत कायम आहे.