मतदानाचा टक्का घसरला; दुपारी वेग वाढला
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मतदान प्रक्रियेत अपेक्षेपेक्षा कमी मतदानाची नोंद झाली. मतदानाचा उत्साह दुपारनंतर वाढल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या चार तासांत केवळ १७.५३ टक्के मतदान झाले होते; मात्र दुपारी ३.३० वाजेपर्यंत मतदानाचा आकडा वाढून ४०.०७ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. कडोंमपाच्या १२२ प्रभागांसाठी ३१ पॅनल निवडणूक रिंगणात उतरले असून, सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. विशेषतः दुपारच्या सत्रात मतदारांचा प्रतिसाद वाढल्याने मतदानाचा वेग लक्षणीयरीत्या वाढला.
यंदाची निवडणूक प्रथमच पॅनल पद्धतीने घेण्यात आली असून, १२२ जागांसाठी ३१ पॅनल निवडणूक रिंगणात उतरले होते. डोंबिवलीतील पॅनल क्रमांक २४ मधील चारही उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित ३० पॅनलमध्ये ४६८ उमेदवार-राजकीय पक्षांसह अपक्ष-निवडणूक रिंगणात राहिले. त्यामुळे संपूर्ण निवडणूक लढतीला चांगलीच कलाटणी मिळाली. प्रचाराच्या रणधुमाळीत भाजप-शिवसेना युतीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभांमुळे प्रचाराला मोठा जोर मिळाला. दुसरीकडे, उबाठा गट आणि मनसेकडून आमदार भास्कर जाधव यांच्या सभा तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा धावता दौरा लक्षवेधी ठरला. मात्र प्रचाराचा जोर असूनही गुरुवारी सकाळपासून मतदान प्रक्रिया संथ गतीने सुरू झाली.
मतदारांच्या चर्चांमधून काही पॅनलमध्ये अटीतटीची दुरंगी लढत होईल, तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांचा प्रभाव भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांना फटका देऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात होता. एकूणच, मोठ्या प्रचारानंतरही अपेक्षित मतदान न झाल्याने केडीएमसी निवडणूक २०२६ मध्ये घटलेला मतदानाचा टक्का ही प्रशासन आणि राजकीय पक्षांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. कामकाजाचा दिवस असतानाही मतदारांनी मतदान केंद्रांकडे गर्दी केल्याचे चित्र दिसून आले असून, संध्याकाळच्या सत्रात मतदानाची टक्केवारी आणखी वाढण्याची शक्यता निवडणूक प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली होती.
वेळेनुसार मतदानाची टक्केवारी (कडोंमपा):
सकाळी ७.३० ते ९.३० : ७.२१ टक्के
सकाळी ११.३० पर्यंत : १७.५३ टक्के
दुपारी १.३० पर्यंत : २९.४८ टक्के
दुपारी ३.३० पर्यंत : ४०.०७ टक्के.