मुंबई : 'मुंबईत अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या सर्व बांगलादेशी नागरिकांना शोधून काढून येत्या येत्या वर्षभरात मुंबई 'बांगलादेशीमुक्त' करू', अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली. महायुतीच्या जाहीरनाम्याच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, 'मुंबईला बांगलादेशी आणि रोहिंग्यांपासून मुक्त करू. वर्षभरात बांगलादेशी शोधून काढू आणि त्यांना परत पाठवून देऊ. बांगलादेशी नागरिक मुख्यत्वे पश्चिम बंगालमधून येतात. तेथे कागदपत्रे तयार करून मुंबईत बेकायदेशीर वास्तव्य करतात. ते आपल्यासारखे दिसतात आणि भाषाही बोलतात, त्यामुळे त्यांना ओळखणे कठीण जाते. यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी च्या माध्यमातून एक विशेष टूल विकसित करण्यात येत आहे. हे टूल सहा महिन्यांत तयार होईल आणि त्याच्या मदतीने बांगलादेशींना शोधणे सोपे होईल. १०० टक्के बांगलादेशी शोधून त्यांना बांगलादेशला पाठवू,' असे आश्वासन फडणवीसांनी दिले.
या घोषणेबरोबरच पालिकेत पारदर्शकतेवरही भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, 'बिल्डिंग प्लानमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करू. डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स डेव्हलपमेंट प्लॅन आणि जिओ स्पेशल डेटाचा वापर करून एआय मॉडेल तयार करण्यात येईल. हे मॉडेल बिल्डिंग प्लॅनमध्ये काय चुकीचे आहे किंवा काय बदल करावे लागेल, हे स्वतः सांगेल. यामुळे बांधकाम प्रक्रियेत होणाऱ्या अनियमितता रोखता येतील आणि शहराच्या विकासाला गती मिळेल', असा विश्वास त्यांनी
व्यक्त केला. कचरा व्यवस्थापनावरही फडणवीस यांनी विशेष भर दिला. ते म्हणाले, 'डंपिंग ग्राउंड बंद करण्याकडे आमची वाटचाल सुरू आहे. नवीन पद्धतीने झिरो गार्बेजचा प्लान राबविण्यात येत आहे. कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात येणार असून, त्यातून स्वच्छ वीज उत्पादन केले जाईल. याशिवाय गॅस निर्मितीही करण्यात येईल. वाहनांसाठी अक्षय ऊर्जा आणि ग्रीन ऊर्जेवर आधारित क्लायमेट अॅक्शन प्लान हाती घेण्यात आला आहे. मुंबईला एक शाश्वत शहराकडे घेऊन जाण्याचा हा प्रयोग आहे,' असे फडणवीस यांनी सांगितले. या योजना शहरातील पर्यावरणीय समस्या सोडवण्यास मदत करतील आणि मुंबईला जागतिक दर्जाचे हरित शहर बनवतील, असा दावा
त्यांनी केला.