मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी रणसंग्रामात भाजपने आता आक्रमक हिंदुत्वाचा पवित्रा घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी महायुती सत्तेत आल्यास मुंबईचे नाव बदलून 'बॉम्बे' होईल, असा जो दावा केला होता, त्याला मंत्री नितेश राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. "मुंबईचे नाव 'बॉम्बे' होणे कधीच शक्य नाही, मात्र उद्धव ठाकरे सत्तेत आले तर मुंबईचे 'मोहम्मद लँड' होणे मात्र निश्चित आहे," अस नितेश राणे यांनी म्हंटल आहे.
उद्धव ठाकरेंच्या 'मुस्लिम लांगुलचालना'वर बोट
नितेश राणे यांनी आपल्या (X) पोस्टमधून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख 'उद्धव मामू' असा करत त्यांच्या बदललेल्या राजकीय भूमिकेची खिल्ली उडवली आहे. राणे यांच्या मते, उद्धव ठाकरे हे केवळ मतपेढीच्या राजकारणासाठी विशिष्ट समाजाचे लांगुलचालन करत आहेत. जर महापालिकेत पुन्हा ठाकरेंची सत्ता आली, तर मुंबईची मूळ ओळख पुसली जाऊन ती एका ठराविक विचारधारेची 'लँड' बनवली जाईल, अशी भीती राणे यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईची अस्मिता भाजपच्या हाती सुरक्षित!
नितेश राणे यांनी आपल्या प्रतिक्रियेतून हे स्पष्ट केले की, मुंबईचे नाव बदलण्याचे धाडस कोणीही करू शकत नाही आणि महायुती असे कधीच करणार नाही. मात्र, उद्धव ठाकरे हे जनतेची दिशाभूल करून भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. "मुंबईची संस्कृती आणि मराठी माणसाचा हक्क केवळ भाजपच सुरक्षित ठेवू शकते, तर ठाकरे गट मुंबईला 'मोहम्मद लँड' बनवण्याच्या मार्गावर आहे," असे विधान राणे यांनी केले आहे.