मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
मुंबई : ठाकरे बंधू युतीत राज ठाकरे यांचा सर्वात मोठा फटका बसणार आहे हे लिहून ठेवा असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप शिवसेना यांची महायुती आणि उबाठा आणि मनसे युतीमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. या पार्श्वभुमीवर एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी स्पष्ट मते मांडली. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने महायुतीसमोर आव्हान उभे राहिलंय का असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, उबाठा आणि राज ठाकरे एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही. या दोघांचीही मते कमी झाली आहेत. जर २००९ साली हे दोघे एकत्र आले असते तर कदाचित तेव्हाचे राजकारण बदलले असते; परंतु आता या युतीचा फारसा प्रभाव नाही. या निवडणुकीनंतर राज ठाकरे यांचा सर्वात पराभव होईल हे लिहून घ्या. या युतीत राज ठाकरेंचा फायदा उद्धव ठाकरेंना मिळेल परंतु उद्धव ठाकरेंचा फायदा राज यांना मिळणार नाही.
राज ठाकरे यांनी खूप काही गमावले असेल ही माझी भविष्यवाणी आहे. ती निवडणुकीनंतर तुम्ही पाहू शकता. मागील २५ वर्ष मराठी माणसांचा विश्वास ठाकरे कुटुंबीयांनी गमावला आहे. मुंबईतून मराठी माणूस बाहेर का गेला, तुम्ही इतकी वर्ष सत्तेत होता. मराठी माणसांना मुंबईत घर का मिळाले नाही. मराठी माणसांना वसई विरार नालासोपारा इथे का जावे लागले असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.
दरम्यान, २०१७ साली आम्ही मुंबई महापालिकेत सत्तेबाहेर राहिलो, आम्ही त्यांच्यासोबत गेलो नव्हतो. ज्यावेळी आम्ही त्यांच्यासोबत होतो तेव्हा महापालिकेत २ प्रमुख पदे असतात. एक महापौर आणि एक स्थायी समिती अध्यक्षपद...२५ वर्षात एकदाही आमचा महापौर असो वा स्थायी समिती अध्यक्ष बनले नाहीत. त्यांच्याकडेच सत्ता होती. महापालिका हेच चालवत होते. आम्हाला विचारतही नव्हते. घोटाळे सुरू होते. २०१५ साली मी मुख्यमंत्री असताना मुंबईतील २०० रस्त्यांच्या कामांची चौकशी केली. त्यात एफआयआरही केला. अनेकजण जेलमध्ये गेले इतका भ्रष्टाचार यांनी केला आहे असा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.