मुंबई : मनसेचे नेते संतोष धुरी यांनी अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. सोमवारी रात्री त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर, मंगळवारी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर संतोष धुरी यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार टीका करत मनातली खदखद उघडपणे मांडली.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बोलताना संतोष धुरी म्हणाले की, आपण महापालिकेची उमेदवारी न मिळाल्यामुळे पक्ष सोडलेला नाही. मात्र, ठाकरे बंधूंमधील युतीत मनसेला जाणीवपूर्वक दुय्यम वागणूक देण्यात आली, असा आरोप त्यांनी केला. ज्या जागांवर शिवसेना ठाकरे गटाकडे उमेदवार नव्हते किंवा विद्यमान नगरसेवक बदनाम होते, त्या जागा मनसेच्या माथी मारण्यात आल्या असा दावा त्यांनी केला.
धुरी यांनी सांगितले की, जिथे मनसेची खरी ताकद होती, त्या जागा पक्षाला देण्यात आल्याच नाहीत. दादर, लालबाग, शिवडी, भांडूप यांसारख्या मराठी लोकांच्या भागांत मनसेला केवळ एकच जागा देण्यात आली. इतकंच नाही, तर मनसेच्या वाट्याच्या काही जागाही ठाकरे गटाला देण्यात आल्या
पुढे बोलताना संतोष धुरी म्हणाले की, उमेदवारी न मिळाल्याचं कोणतंही दुःख नाही. मात्र, पक्षाचे नेते संदीप देशपांडे यांना कोणत्याही चर्चेत सामावून न घेणं हे मनसेसाठी धोक्याचं ठरलं. याबाबत विचारणा केली असता, वरच्या नेत्यांनी तह केला असल्याचं सांगण्यात आलं. या तहात राज ठाकरे यांनी दोन महत्त्वाचे किल्ले गमावल्याचा दावा धुरी यांनी केला.
या तहानुसार संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे माध्यमांत किंवा चर्चेत दिसू नयेत, असा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे मनसेत राहणं योग्य वाटलं नाही आणि पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं धुरी यांनी स्पष्ट केलं.
संतोष धुरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेवरही थेट सवाल उपस्थित केले. राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासमोर पक्ष सरेंडर केल्याचा आरोप त्यांनी केला. संजय राऊत आणि अनिल परब यांच्या दबावापुढे शरणागती पत्करल्याचंही त्यांनी म्हटलं.
जसं उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचे शिलेदार दूर गेले, तसाच प्रकार आता राज ठाकरे यांच्या बाबतीत घडतो आहे, असा आरोप धुरी यांनी केला. मनसेचे सहा नगरसेवक फोडले गेले, कार्यकर्त्यांना त्रास देण्यात आला, तरीही अशा पक्षासोबत युती करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
मनसेतील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्रास दिला गेला असून, त्याच पक्षाशी युती केल्याने मनसेची ओळख धोक्यात आली आहे, असा आरोप करत संतोष धुरी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.