Hema Malini On Dharmendra Separate Prayer Meet : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना गेल्या वर्षी देवाज्ञा झाली. ९०व्या वाढदिवसाच्या अगदी १५ दिवस आधीच,२४ नोव्हेंबर २०२५ रोजी धर्मेंद्र यांचे मुंबईत राहत्या घरी निधन झालं. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना ऑक्टोबर महिन्यात मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र प्रकृती थोडी सुधारल्यावर त्यांना घरी हलवण्यात आले. अखेर काही दिवसांनी २४ तारखेला त्यांनी अखेरचा श्वास घेतला . त्यांच्या निधनानंतर दोन वेगवेगळ्या शोकसभा झाल्या. एक ताज लँड्समध्ये देओल कुटुंबाकडून शोकसभेचं आयोजन करण्यात आल होतं, तर त्याच दिवशी हेमा मालिनी यांच्या घरी पूजा आणि शोकसभा होती. या दोन शोकसभांवरून बरीच चर्चा झाली, तर्क-वितर्क व्यक्त करण्यात आले.
११ डिसेंबर रोजी हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासाठी दिल्लीत आणखी एक शोकसभा ठेवली होती. वेगवेगळ्या शोकसभांनंतर धर्मेंद्र यांच्या दोन कुटुंबातील नातं, तणाव यासंदर्भातील अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. अखेर आता हेमा मालिनी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या सर्वांवर भाष्य केलं आहे.
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर वेगवेगळ्या शोकसभा का?
मुलाखतीत हेमा मालिनी या २ वेगवेगळ्या शोकसभांबद्दल बोलल्या. ” हा आमच्या घरातील वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही आपापसांत बोललो. माझे सहकारी वेगळे लोक असल्याने मी माझ्या घरी प्रार्थना सभा आयोजित केली. मी राजकारणात असल्याने मग दिल्लीत प्रार्थना सभा घेतली आणि राजकीय क्षेत्रातील माझ्या मित्रांसाठी तिथे प्रार्थना सभा घेणे माझ्यासाठी महत्त्वाचे होते. मथुरा हा माझा मतदारसंघ आहे आणि तिथले लोक धर्मेंद्र यांचे चाहते आहेत. म्हणून मी तिथेही प्रार्थना सभा आयोजित केली. मी जे केले त्याबद्दल मी आनंदी आहे” असं हेमा मालिनी यांनी नमूद केलं.
Dharmendra : मृत्यूपूर्वी धर्मेंद्र यांचा मोठा निर्णय! ना सनी, बॉबी, ना ईशा, अहाना… धर्मेंद्र यांनी गावची जमीन कुणाला दिली? असं का केलं?
२७ तारखेला झालेल्या देओल कुटुंबाच्या प्रार्थना सभेला सलमान खान, रेखा, विद्या बालन, ऐश्वर्या राय बच्चन आणि इतर अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. तर दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, जनपथ, दिल्ली येथे झालेल्या शोकसभेला अमित शहा, निर्मला सीतारामन, किरेन रिजिजू, ओम बिर्ला, कंगना रणौत, रणजीत, अनिल शर्मा आणि इतर राजकारणी आणि चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनी हजेरी लावली होती.
प्रकाश कौर आणि सनी-बॉबीशी कोणतेही वाद नाहीत
धर्मेंद्र यांचे लोणावळा येथील फार्महाऊस त्यांच्या चाहत्यांसाठी संग्रहालयात रूपांतरित केले जाऊ शकते का? असा प्रश्न याच मुलाखतीमध्ये, हेमा मालिनी यांना विचारण्यात आला. सनी देओलही हा असेच काहीतरी प्लॅन करत आहे, असं त्यावर हेमा मालिनी यांनी सांगितलं. धर्मेंद्र आणि त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर आणि त्यांची मुलं सनी-बॉबी यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत असं सांगत त्यांनी फुटीच्या सर्व अफवा फेटाळून लावल्या. “सगळं काही व्यवस्थित चाललं आहे. त्यामुळे ही दोन वेगवेगळी कुटुंबं आहेत, काय होईल ? ही काळजी करण्याची गरज नाही. आम्ही सगळे ठीक आहेत, कोणालाही काहीच चिंता करण्याची गरज नाही” असंही त्यांनी नमूद केलं.