आघाडीत ‘घडले-िबघडले’ सुरूच!
महायुतीत २०७ जागांवर एकमत, विरोधकांच्या जागावाटपानंतर उर्वरित २० जागांवर निर्णय
मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी महायुतीत अनेक ठिकाणी जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून सर्वत्र नेतेमंंडळी स्थानिक पातळीवरील नेत्यांशी समन्वय साधत आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये अजूनही ‘घडलेय-बिघडलेय’चा प्रयोग सुरूच असल्याने गोंधळाचे चित्र आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक अर्ज भरण्याची अंतिम मुदत आता अवघ्या ७२ तासांवर आलेली असतानाच महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, नेतेमंडळी व निवडणूक लढवू पाहणाऱ्या इच्छुकांना महायुतीचा २०७ जागांवर जागावाटपात मनोमिलाफ झाल्याचा दिलासा मिळाला आहे. उर्वरित २० जागांचा निर्णय विरोधकांच्या जागावाटपानंतर घेतला जाणार आहे. ठाणे महापालिकेतही महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटल्यातच जमा असून केवळ तीन जागांचा निर्णय अद्याप झाला नाही.उबाठा गट आणि मनसेने एकीकडे मराठी अस्मितेचा मुद्दा उचलून धरत मतदारांना भावनिक साद घालण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मैथिली ठाकूर, मनोज तिवारी, निरहुआ व रवी किशन मुंबईत जोरदार प्रचार करतील. मुंबईतील ज्या वॉर्डात उत्तर भारतीयांची संख्या अधिक आहे, तिथे या प्रचारकांच्या सभा व रोड शोचे आयोजन करण्यात येणार आहे. शिवसेनेनेही हाच प्लान आजमावत सिनेअभिनेता गोविंदाला मैदानात उतरवले आहे.
नवी मुंबईत अफवांच्या बाजारामुळे महायुतीत संभ्रम
संदीप नाईकांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली असली तरी भाजप व शिवसेना महायुतीचे जागावाटपाचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. दर दोन तासांनी युती झाली, युती तुटली अशा नवनवीन राजकीय अफवा व चर्चा पसरत असल्याने अधिकृत घोषणेची वाट महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी पाहत आहेत. शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंगचा असल्याने समसमान जागांचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या समर्थकांसाठी, भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसाठी ४० जागा मागितल्याने नाईकांना मानणाऱ्यांना बेलापुरात अडथळे निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
वसई-विरारमध्ये मनसे बविआची शिट्टी वाजविणार
वसई-विरार महापालिकेमध्ये राज ठाकरे यांची मनसे आणि हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी एकत्र लढणार आहेत. मनसेचे उमेदवार हे बविआच्या शिट्टी या चिन्हावर लढणार आहेत. त्याचवेळी ठाकरेंची शिवसेना मात्र स्वतंत्र लढणार आहे. वसई- विरारमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंचे पक्ष वेगवेगळे लढणार आहेत.