२० जागांचा पेच कायम; शिवसेना आणि भाजप नेते पोहोचले एकनाथ शिंदेंच्या भेटीला
मुंबई : भाजप आणि शिवसेनेत गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेली जागावाटपाची चर्चा अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. दोन्ही पक्षांनी एकूण २०७ जागांवर एकमत दर्शवले असून, भाजप १२८ तर शिवसेना ७९ जागा लढवणार आहे. २० जागांवर अद्याप पेच कायम असल्याने, या जागांचा तोडगा काढण्यासाठी भाजप-शिवसेनेचे नेते शनिवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले.
शनिवारी दुपारी वांद्रे येथील रंगशारदा हॉटेलमध्ये महायुतीच्या प्रमुख नेत्यांची प्रदीर्घ बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी माध्यमांशी बोलताना जागावाटपावर भाष्य केले. ते म्हणाले, "भाजप १२८ आणि शिवसेना ७९ अशा २०७ जागांवर आमचे एकमत झाले आहे. उर्वरित २० जागांवर वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन लवकरच तोडगा काढला जाईल. या जागांवर निर्णय घेताना समोरचा उमेदवार कोण आहे, याचा प्रामुख्याने विचार केला जाईल. विरोधी आघाडीचा उमेदवार जर प्रबळ असेल तर त्या जागी भाजपचा की शिवसेनेचा उमेदवार उतरवायचा, हे वरिष्ठ नेते ठरवतील. गरज पडल्यास दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारांची अदलाबदलही केली जाईल. केवळ जागांच्या संख्याबळापेक्षा 'इलेक्टिव्ह मेरिट' म्हणजे निवडून येण्याची क्षमताच प्राधान्याची आहे", असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील सत्तेचा रंग बदलू पाहणाऱ्या शक्तींना परास्त करण्यासाठी महायुती पूर्णपणे सज्ज असल्याचे साटम म्हणाले. "सर्व मित्रपक्षांना समाधानकारक जागा दिल्या जातील. कोण किती जागा लढवतो हे महत्त्वाचे नाही, तर महायुती कशी जिंकते हेच महत्त्वाचे आहे. दुसऱ्या पक्षांचे निर्णय पाहून आमचे धोरण ठरणार नाही," असेही त्यांनी नमूद केले.
गरज पडल्यास उमेदवारांची अदलाबदल - राहुल शेवाळे
शिवसेना सरचिटणीस तथा माजी खासदार राहुल शेवाळे म्हणाले, "महायुती आता फक्त जिंकण्याचे नियोजन करत आहे. गरज पडल्यास उमेदवारांची अदलाबदल करू, दोन्ही पक्षांमध्ये सन्मानजनक जागावाटप होईल. मुंबईत महायुतीने किमान १५० जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. पक्ष आणि जागा बाजूला ठेवून प्रत्येक उमेदवार कसा निवडून येईल यावरच आमचा फोकस आहे," असे शेवाळे म्हणाले.
२० जागांबाबत शिंदे घेणार निर्णय
रंगशारदा येथील बैठक संपल्यानंतर लगेचच भाजप-शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर पोहोचले. मंत्री आशिष शेलार, उदय सामंत आणि राहुल शेवाळे यांच्यासह इतर नेते उरलेल्या २० जागांबाबत शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर जागावाटपाचा अंतिम आकडा जाहीर केला जाणार आहे.