"पराभव जवळ दिसताच राऊतांची सकाळची बडबड सुरू!" : नवनाथ बन
मुंबई : "मुंबई महानगरपालिकेत उबाठा आणि मनसेचा पराभव आता निश्चित झाला आहे. हा पराभव समोर दिसू लागल्यानेच संजय राऊत यांनी रोज सकाळी उठून बिनबुडाचे आरोप करण्याची आणि बडबड करण्याची प्रथा सुरू केली आहे," अशा बोचऱ्या शब्दांत भाजपचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन (Navnath Ban) यांनी राऊतांचा समाचार घेतला. आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था, पोलीस दलाचा सन्मान आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटाला आरसा दाखवला.
संजय राऊतांचा 'खोटे बोला, रेटून बोला' पॅटर्न
संजय राऊत यांच्यावर टीका करताना नवनाथ बन म्हणाले की, "रोज नवे आरोप करायचे पण पुरावा एकही द्यायचा नाही, हा राऊतांचा जुना पॅटर्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासाच्या घोडदौडीवर अशा बालिश आरोपांचा कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्ट्रातील १४ कोटी जनता देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे, तर उबाठा गट आता राजकीयदृष्ट्या पूर्णपणे अप्रासंगिक झाला आहे."
पोलिसांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही
महाराष्ट्र पोलीस दलाचा उल्लेख 'टोळी' असा करणाऱ्या संजय राऊतांवर बन यांनी संताप व्यक्त केला. "दिवस-रात्र जनतेच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या खाकी वर्दीचा 'टोळी' म्हणून अपमान करणे ही उबाठाची संस्कृती आहे. पोलिसांना 'घरघडी' म्हणणाऱ्यांची ही परंपरा महाराष्ट्र आणि येथील जनता कधीही सहन करणार नाही. पोलिसांवर टीका करणे म्हणजे संपूर्ण पोलीस दलाचा आणि त्यांच्या बलिदानाचा अपमान आहे," असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
गुंडगिरी आणि वसुलीची भाषा कुणी करावी?
"ज्यांनी सचिन वाझेसारख्याला 'लादेन' म्हणून पाठिशी घातले आणि 'वसुली सरकार' चालवले, त्यांना गुंडगिरीची भाषा शोभत नाही. गुंडांना अभय देण्याचे पाप उबाठाने केले आहे. मात्र, फडणवीस सरकारमध्ये कायद्याचे राज्य असून गुंडांना येथे कोणताही थारा नाही," असे म्हणत त्यांनी गुंडगिरीच्या आरोपांना उत्तर दिले. सातारा प्रकरणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होणाऱ्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून केवळ बदनामीसाठी हा खोटा प्रचार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तुमचे हिंदुत्व 'खिचडी घोटाळ्या'चे!
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरेंना थेट सवाल विचारले. "मुस्लिम मोर्चे काढणे, उर्दू भवन उभारणे आणि अजान स्पर्धा घेणे हे तुमचे कोणते हिंदुत्व आहे? पत्राचाळ घोटाळा आणि गरिबांची खिचडी चोरणे हे तुमचे हिंदुत्व का? आमचे हिंदुत्व राम मंदिर उभारण्याचे आणि कलम ३७० हटवण्याचे आहे. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही," असा टोला त्यांनी लगावला.